आता तरी शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत सीटूसह सर्व कामगार संघटनांची मागणी…
मुंबई : आज प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकऱ्यांनी प्रचंड ट्रॅक्टर रॅली करून शक्ती प्रदर्शन केले. पोलिसांनी अनेक ठिकाणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परिणामी काही ठिकाणी पोलिस, शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाल्याचे सीटूने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांचा झेंडा फडकविला. याबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. परंतु या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून त्यांनी जबाबदारी स्विकारून शेतकऱ्यांची माफी मागावी व तीनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
गेले दोन महिने शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर अत्यंत शांततेने ठिय्या आंदोलन करीत आहेत. त्या अगोदर जून महिन्यापासून देशातील पाचशे शेतकरी संघटनांना या अध्यादेशाचे विरोधात आहेत व त्यांनी हे तीन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे, परंतु मोदी सरकार हट्टवादीपणाने शेतकऱ्यांची मागणी मान्य करायला तयार नाही.
देशाच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये आजच्या सारखी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. हे केंद्र सरकारचे व पंतप्रधान मोदींचे मोठे अपयश आहे. ज्या वेळेला शेतकरी आंदोलन करत होते त्याची दखल पंतप्रधानांनी न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये यावे लागले. या परिस्थितीला खुद्द पंतप्रधानच जबाबदार आहेत. पंतप्रधानाच्या अहंकारी व हट्टवादी स्वभावामुळे व जनतेच्या इच्छाआकांक्षांना लाथाडल्यामुळे आजच्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तरी पंतप्रधानांनी हटवादीपणा सोडावी आणि तिन्ही शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी सीटूसह सर्व कामगार संघटना करीत असल्याचे सीटूचे राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी म्हटले आहे