शिक्षण संचालक,शिक्षणाधिकारी यांना निवेदन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२१-आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर होऊन आता आठवडा झाला. संकेतस्थळ व्यवस्थित चालत नसल्याने प्रवेश निश्चित होऊनही प्रवेशासाठी पालकांची तारांबळ उडत आहे.
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत १२ एप्रिलला जाहीर झाली आणि १३ एप्रिलपासून प्रवेशाला सुरुवात झाली; मात्र तेव्हापासून
वेबसाईट सर्व्हर डाऊनमुळे चालत नसल्याने आरटीई प्रवेशाचा मोठा खोळंबा निर्माण झाला आहे.
मागील सलग सात वर्षे संकेतस्थळावर सतत तांत्रिक समस्या येऊनही शिक्षण खात्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने दूर्लक्ष केले आहे. निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत आहे. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे.प्रवेश निश्चिती कागदपत्रे पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. प्रवेशापूर्वी येत्या २५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.
अनेक पालक इंटरनेट अनभिज्ञ आहेत.तरी वेबसाईट वरील तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव छाजेड यांनी प्राथमिक शिक्षण संचालक,पुणे व शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड मनपा यांना निवेदनाद्वारे केली आहे.