पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पिंपरी चिंचवड शहरात आज मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात येत आहे.घरोघरी वेळुची काठी,उटणं,सुगंधीत तेल,हळद,कुंकू,अष्टगंध,अक्षता, केशरी व सप्तरंगी मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला,चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा गडू,सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती,नागलीचे पाने,फळे,सुपारी,तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले.
कडुनिंबाचा प्रसाद- कडुनिंबाची कोवळी पाने,फुले,चण्याची भिजलेली डाळ,मध, जिरे,हिंग,गुळ ई सात्विक पान फुले व पूजा साहित्य वापरून गुढी पूजा करण्यात आली.त्यामुळे शहरात खूप आनंददायी वातावरण निर्माण झाले.
आजपासून नववर्षाच्या स्वागताची सुरवात होते-बापू शिंदे-बंडू पवार,चिखली प्राधिकरण
आजच्या दिवसापासुन शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात.वसंत ऋतूचा आरंभ होतो.शेतकरी हा सण साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी करतात. तु या वर्षी आम्हाला साथ दे,अशी प्रार्थना करून शेतकरी नव्या चैतन्याने नववर्षाचे स्वागत करतात.
पर्णहीन वृक्षांना कोवळी पालवी फुटते-ऋतुराज जवळी येतो-किशोर थोरात-शिवतेज नगर,चिंचवड
गुढी पाडवा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर आदिमविश्व उत्पत्तीच्या प्रथम क्षणांचा गुढीपाडवा साक्षीदार आहे. महाप्रलयानंतर ब्रम्हदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले.अशी आख्यायिका आहे.
गुढी पाडवा निसर्गात चैतन्याची निर्मिती करतो-रवींद्र काळे-तानाजीनगर,चिंचवड
ऋतूचक्राने हळुवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहुल लागावी, रंग विभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे पुष्पवैभव न्याहाळताना आंबे मोहराचा हवाहवासा वाटणारा सुगंध यावा नि नवऋतूच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोकिळेने ”राग वसंत” गावा.
चैत्राच्या टक्के उन्हातही निसर्ग मनाला आनंद देतो-विठ्ठल आगवणे,महात्मा फुलेनगर,चिंचवड
चैत्राच्या टक्क उन्हातही मनाला उभारी देणारा हा गुढीपाडव्याचा सण माणसांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येतो. चैत्राच्या महिन्यात पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला निसर्ग आणि वसंताची बहार घेऊन येणा-या हा सण सर्वत्र पान,फुले,साखर गाठी बांधून साजरा केला जातो.
कडूलिंबाचे या दिवशी वेगळे महत्व असते-सुनील कोल्हे-शाहूनगर,चिंचवड
गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाचे वेगळेचं महत्त्व आहे. ही पाने सदाहरित आणि सदापर्णी आहेत. याचे पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक दुर्धर नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहेत. कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावतात. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो. कडुलिंब चवीने कडवट पण बहुगुणी वृक्ष आहे.त्याची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहात असून यामध्ये कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट असतात.