Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीमनुस्मृती दहन दिवस : ग्रंथवेड्या ,पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी का जाळली मनुस्मृती ?

मनुस्मृती दहन दिवस : ग्रंथवेड्या ,पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी का जाळली मनुस्मृती ?

अस्पृश्य व स्त्रियांच्या मुक्ततेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करून समाजातील अनिष्ट परंपरांचे जोखड मोडून काढले होते.आजचा हा दिवस महाड येथे मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.मनुस्मृतीमध्ये अस्पृश्यतेचे, वर्णभेदाचं, जातिव्यवस्थेचं, स्त्रीच्या गुलामगिरीचे समर्थन केले जात होते.२० मार्च १९२७ ला चवदार तळ्याच्या सत्याग्रह करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची दारे खुली केली. समाजव्यवस्था राबविणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे यावेळी दहन करण्यात आले.

मनुस्मृती जाळून टाकावी, असे महात्मा जोतिराव फुलेंनी वक्तव्य कले होते. परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम डॉ.बाबासाहेबांनी केले.२५ डिसेंबर १९२७ रोजी रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत मनुस्मृतीचे दहन केले.यावेळी बाबासाहेबांच्या साथीला बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हे देखील होते.


मनुस्मृतीत नेमकं काय आहे?

“स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. मनूने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या 2684 आहे, काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या 2694 आहे,” अशी माहिती इतिहासकार नरहर कुरुंदकरांनी दिली आहे. नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर तीन व्याख्यानं दिली होती. त्या व्याखानांच्या संग्रहात कुरुंदकरांनी मनुस्मृतीचं अंतरंग उलगडून दाखवलं आहे. “माझी भूमिका मनुस्मृती दहन करण्याचे स्वागत करणारीच आहे,” असं कुरुंदकर स्पष्ट करतात.

मनुस्मृतीचं स्वरूप सांगताना कुरुंदकर लिहितात, “इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली. पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ, सृष्टीची निर्मिती, चार युगे, चार वर्ण, त्यांची कामे, ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय आले आहेत. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य, गुरूसेवा इत्यादी संस्कारांची माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार, विवाह विधी आणि श्राद्धाची माहिती आहे. चौथ्या अध्यायात गृहस्थधर्म, भक्ष्याभक्ष्य, 21 प्रकारचे नरक इत्यादी माहिती आहे.” “पाचव्या अध्यायात स्त्रीधर्म, शुद्धाशुद्ध इत्यादी माहिती पुन्हा देण्यात आली आहे. सहाव्या अध्यायात संन्यास आश्रम, सातव्या अध्यायात राजधर्म, आठव्या अध्यायात व्यवहार, साक्ष, गुन्हे, न्यायदान ही माहिती आहे. नवव्या अध्यायात वारसाहक्क, दहाव्या अध्यायात वर्णसंकर, अकराव्या अध्यायात पाप म्हणजे काय, हे सांगण्यात आलं आहे, बाराव्या अध्ययात तीन गुण, वेद प्रशंसा हे विषय आहेत. हे या ग्रंथांचं साधारण स्वरूप आहे,” कुरुंदकर सांगतात.

मनुस्मृती ग्रंथांत हक्क, गुन्हे, साक्ष, न्यायदानाची माहिती आहे. त्यामुळे आजच्या काळातील IPC किंवा CrPC प्रमाणे याची रचना आहे असं वाटतं. पण त्याचं स्वरूप तसं नाही. इंग्रज येण्यापूर्वी देशात या ग्रंथाचा वापर कायद्याचा ग्रंथ म्हणून होत नव्हता, असं राजीव लोचन यांनी बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. राजीव लोचन हे पंजाब विद्यापिठात इतिहास हा विषय शिकवतात.

राजीव लोचन सांगतात, “ज्या काळात बौद्ध संघाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली. आणि ब्राह्मण हा सर्वांत श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला. या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे.””एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई. ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यां वाईट होईल असं सांगण्यात येत असे. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे. पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे, तिला धार्मिक अधिकार नाहीत, पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्गप्राप्ती होऊ शकते हे त्यात लिहिलं आहे,” राजीव लोचन सांगतात.


डॉ. आंबेडकर आणि मनुस्मृती दहन

25 डिसेंबर 1927 रोजी तत्कालिन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं. “मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली होती त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं. मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीजं मनूने पेरली आहेत,” असं डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम या ग्रंथात लिहिलं आहे.त्यांच्या ‘हू वेअर द शुद्राज’ आणि ‘अनाहायलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केली आहे.

महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली. या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं ते वर्णन करत. “चातुर्वण्य निर्माण करून मनूने श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं,” असं डॉ. आंबेडकर म्हणत.

सोर्स: बीबीसी
संकलन रत्नदीप सरोदे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय