Saturday, May 4, 2024
Homeकृषीजुन्नर : गटविकास अधिकाऱ्यांना किसान सभेचा साडेचार तास घेरावा

जुन्नर : गटविकास अधिकाऱ्यांना किसान सभेचा साडेचार तास घेरावा

अकार्यक्षम अधिकारी आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची किसान सभा करणार जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

जुन्नर : पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन आज (दि.१८) साडेचार तास घेरावा घालण्यात आला.

किसान सभेने दि. १६ सप्टेंबर रोजी रोजगार हमीची गावागावांत कामे सुरु करावीत. यांसह मनरेगाशी संबंधित अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यासाठी निवेदन दिले होते. पोलीस प्रशासनाने कोविड १९ च्या परिस्थितीवर सहकार्य करून चर्चेने प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. 

गावागावांमध्ये रोजगार हमीची कामे चालू करण्याची मागणी

किसान सभेने शिष्टमंडळाने आज ११.३० वाजता गटविकास अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांनी असहकार्याची भूमिका घेतली. किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी मागेल त्याला काम मिळालेच पाहिजे, काम न देणारे बी. डी. ओ. प्रशासन मुर्दाबाद, बी. डी. ओ. प्रशासन होश मे आओ, गावागावांत मनरेगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे आदी घोषणांनी कार्यालय दणाणून सोडले.

गटविकास अधिकारी जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना कार्यालयातच रोखून धरण्याची भूमिका घेतली. सदर आंदोलनाची दखल घेत जुन्नर पोलीस निरीक्षक मोहिते, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी यावेळी हस्तक्षेप केला. संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली आणि गट विकास अधिकारी यांना प्रश्न सोडविण्याची विनंती केली परंतु तरीही गट विकास अधिकारी निर्णय घेण्यास असमर्थ ठरले. तब्बल साडेचार तास चर्चा सुरू होती.

गटविकास अधिकाऱ्यांचा असमर्थ भूमिकेचा किसान सभेने तीव्र निषेध केला असून या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. तसेच मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी म्हटले आहे. यासाठी आंदोलन उभे करणार असून वेळ आली तर पंचायत समितीला घेरावा घालण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

●  ग्रामपंचायमध्ये काम मागणीचे अर्ज स्विकारले जावेत. तसेच ग्रामपंचायतमध्ये काम मागणीचे अर्ज उपलब्ध करावेत.

● हिवरे तर्फे मिन्हेर, सितेवाडी, कोल्हेवाडी या ग्रामपंचायतच्या दाखल प्रस्तावांना ताबडतोब प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. अन्यथा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत मजुरांना कायद्याप्रमाणे बेरोजगार भत्ता द्यावा.

● तळेरान गावातील ७५ मजुरांनी कामाची मागणी करुन २ महिने झाले तरीही कामे चालू केली नाहीत, त्यामुळे मजुरांना बेरोजगार भत्ता मिळावा.

● खटकाळे – खैरे ग्रामपंचायतमध्ये मजुरांचे काम मागणीचे अर्ज स्वीकारावेत.

● तालुक्यातील इतर गावांमध्ये ग्रामसेवकांकडून कायद्याची माहिती देऊन रोजगार हमीची कामे चालू करावीत.

● प्रत्येक गावामध्ये ताबडतोब शेल्पवर कामे मंजूर करावीत.

● तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला मनरेगाचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे.

● प्रत्येक गावनिहाय तज्ञांकडून शिवार भेटी आयोजित करून मनरेगाची कामे काढावीत.

● प्रत्येक महिन्याला मनरेगा संबंधित यंत्रणेची संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलवावी.

● प्रत्येक महिन्याला गावागावांत रोजगार दिवस साजरा करावा.

● कुशल अकुशलच्या रेशोप्रमाणे जनावरांसाठी गोठे ग्रामपंचायत पातळीवर मंजूर करावेत.

या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघचे तालुका सचिव गणपत घोडे, आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच मुकुंद घोडे, एस. एफ. आय. चे तालुका अध्यक्ष अक्षय घोडे,  भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघचे तालुका उपाध्यक्ष संदिप रेंगडे, दीपक  लाडके, गणेश मराडे, सचिन मोरे, चेतन जोशी, खंडू मराडे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय