Sunday, May 5, 2024
HomeNewsसांस्कृतिक लोकशाही शुद्ध राहिली तर राजकीय लोकशाहीला भवितव्य आहे – श्रीपाल सबनिस

सांस्कृतिक लोकशाही शुद्ध राहिली तर राजकीय लोकशाहीला भवितव्य आहे – श्रीपाल सबनिस

पिंपरीत मातंग ऋषी साहित्य संमेलन संमेलन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: “सर्व धर्माच्या पातळीवरती मातंग ऋषीचे योगदान पूरणामध्ये पाहायला मिळते. वेद काळापासून मातंग ऋषीचं समन्वयाचे कार्य महत्त्वपूर्ण पाहायला मिळते. मंग, मातंग ही संज्ञा जातीवाचक नाही. ती वंशवाचक आहे. मातंगऋषी हे मातंग जातीचे नाही तर तो वंश आहे, गण आहे. गणवाचक आहे समूवाचक आहे. म्हणून मातंग या शब्दाला केवळ जातीवाचक रूपात घेऊ नये. जे वेदांत लिहिलं गेलं सांगितलं गेलं ते प्रत्यक्षात घडलं नाही. भारताची लोकशाही समृद्ध करायचे असेल तर सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करावी लागेल. सांस्कृतिक लोकशाही जगणं, वाढवणं तिला मोठं करणे गरजेचे आहे. राजकीय लोकशाहीमध्ये दोष निर्माण झालेले आहेत. राजकीय लोकशाहीमध्ये विरोध आहे. भ्रष्टाचार आहे.बेगडीपणा आहे. दांभिकपणा आहे राजकीय लोकशाही संस्कृतीचे भान ठेवत नाही. संस्कृतीच्या नायक किंवा सांस्कृतिक लोकशाही जपणारी माणसं ही सर्व सामान्य आहेत. सांस्कृतिक लोकशाही जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सांस्कृतिक लोकशाही शुद्ध राहिली तर राजकीय लोकशाहीला भवितव्य आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मातंग साहित्य परिषदेच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात काळेवाडी, पिंपरी, पुणे येथील राजवाडा लॉन्स येथे एक दिवशीय मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि.२०/११/२०२२ रोजी विवेकवादी विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मातंग ऋषींच्या नावाने हे भारतातील पहिले साहित्य संमेलन होते. मातंगऋषी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले.

ह्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या स्वागताध्यक्षाखाली पार पाडले. संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून समरसता कार्यकारणीचे सदस्य निलेश गद्रे हे होते. उद्घाटन प्रसंगी सिनेचित्रपट अभिनेते संदीप पाठक, कवी राजन लाखे, शाहीर डॉ.भास्कर म्हरसाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अंबादास सगड, ज्येष्ठ साहित्यिक संपत जाधव, ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर कसबेकर, कवयित्री किरण मोरे-चव्हाण, लेखक गणेश खंडाळे, कवि महेंद्रकुमार गायकवाड, डॉ.संदीप ननावरे, रविंद्र जगदाळे, गझलकार संतोष कांबळे इ. मान्यवर उपस्थित होते.

मातंग साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांनी मातंग साहित्य परिषदेचे सन्मान चिन्ह देऊन डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सन्मान केला.

याप्रसंगी धम्मज्योती गजभिये म्हणाले” मातंगऋषी साहित्य संमेलन ही भारतभूमीवर घडणारी महत्त्वपुर्ण ऐतिहासिक घटना आहे. जगामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये विश्वगुरू म्हणून भारत पुढे येत आहे. या विश्वगुरूच्या मागे खंबीर अशी ऋषीमुनींची विचारधारा उभी आहे. श्रमण संस्कृतीचे विचारधारा आहे. खरंतर ऋषी मुनींच्या विचारकार्यानं या देशाला एक आध्यात्मिक अशी परंपरा लाभलेली आहे. आधुनिक काळात मातंग साहित्य परिषदेने मातंगऋषींच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित करून एक नवं पाऊल टाकले “.

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांची प्रकट मुलाखत साहित्यिक / लेखक गणेश खंडाळे यांनी घेतली संदीप पाठक यांनी आपल्या मुलाखतीत आपला संघर्षपूर्ण जीवनप्रवास मांडला. या मुलाखतीच्या शेवटच्या भागात वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकातील काही प्रसंग सादर करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.

दिवसभराच्या संमेलनात एकूण तीन कवी संमेलनाचे सत्र आयोजित करण्यात आले होते. या तीन संमेलनाच्या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी राज अहेरराव, ऍड.महेंद्रकुमार गायकवाड आणि सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली तीन कवी संमेलन संपन्न झाले या कवी संमेलनात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी कवयित्री यांनी कविता सादर केल्या. आणि रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील गोडबोले उपस्थित होते.

ज्येष्ठ गजलकार रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य संमेलनात गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. या गझल मुशायरात संतोष कांबळे, विजय वडवेराव, गणेश भुते, आदेश कोळेकर, संदिप जाधव, संजय खोत, निलेश शेंबेकर, मीना शिंदे, सुहास घुमरे, रेखा कुलकर्णी, डॉ.नरसिंग इंगळे इत्यादी गझलकरांनी गझला सादर केल्या.

साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी समरसता क्षेत्र कार्यकारणी सदस्य निलेश गद्रे यांनी “सर्वधर्म समभाव माननारा, भारतीय सेक्युलर माननारा हे हिंदु धर्माचे पर्यायी शब्द आहेत. भारतीय म्हणजे काय सर्वधर्मसमभावाची व्याख्या काय? या देशात जो जो सर्वधर्मसमभाव मांनतो तो तो हिंदू आहे असं आपण मानलं पाहिजे. भारतीयची व्याख्या म्हणजे केवळ भारतात राहिला म्हणजे भारतीय नव्हे. तर भारतात जो राहतो. भारतीय राष्ट्रीय पुरुषावर ज्याचे प्रेम आहे. भारतातल्या समाजसुधारकावर ज्याचे प्रेम आहे.भारतभूमीवर प्रेम आहे.तसेच भारताच्या आक्रमणकर्त्यावर ज्याच्या मनात ईर्षा आहे द्वेष आहे.त्याचबरोबर राष्ट्रभक्त बद्दल प्रेम जीव्हाळा बाळगणं म्हणजे भारतीय म्हणता येईल. जर अशी व्याख्या केली तर भारतीयांची व्याख्या आणि हिंदुत्वाची व्याख्या यात आपल्याला फरक करता येणार नाही.”

संमेलनाचे आयोजक तथा मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे संमेलनाचे प्रस्ताविक केले तर कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.शेवटी उद्घाटन सत्राचे आभार विशाल गवळी यांनी केले. तर समारोपाचे आभार डॉ माणिक सोनवणे यांनी मांडले. ग्रंथ आणि शस्त्र यांचा सुरेख संगम मातंगऋषी साहित्य संमेलनात पाहायला मिळाला. मातंग ऋषी साहित्य संमेलनात रवींद्र जगदाळे यांनी शिवकालीन शस्त्र अस्त्राचे प्रदर्शन भरवले होते ह्या प्रदर्शनांने संमेलनातील प्रेक्षकांची वाह वाह मिळवली.

मातंगऋषी साहित्य संमेलनात विविध पुस्तकांचे स्टॉल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचा संविधान रथ हे आकर्षणाचे केंद्र झाले होते. या संमेलनात विविध सत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध सत्राचे सूत्रसंचालन बबन चखाले, मनीषा पाटील वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, डॉ. मोहन शिंदे, डॉ. मीनाक्षी गोणारकर, सुहास घुमरे इत्यादींनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी डॉ धनंजय भिसे, डॉ अंबादास सगट, विशाल गवळी, शिवाजी भिसे, निलेश भिसे, प्रल्हाद काळे इत्यादींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय