जुन्नर : बोरी बुद्रुक गावातील वाणी मळयात शाॅर्टसर्कीट होऊन ४५ एकर ऊस जळाल्याने ९० लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार दि.२८ रोजी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)येथील वाणीमळयातील दिनकर काळे, सुभाष काळे, निवृत्ती काळे,शिवाजी काळे, शिवाजी बेल्हेकर, ज्ञानेश्वर चिंचवडे, रोहन बेल्हेकर,अशोक काळे, सुदाम काळे, इंदुबाई जाधव, जयराम काळे, दत्तात्रय काळे, विठ्ठल काळे, अभय चोरडिया, राजेंद्र चोरडिया, वसंत काळे, रमेश काळे, या १८ शेतकऱ्यांचे एकूण ४५ एकर क्षेत्र असून या क्षेत्रातून गेलेली महावितरणची विद्युत तारेचा शॉर्टसर्किट होऊन ऊसाने पेट घेतला.
यातील काही उसाची तोड चालू होती तर काही ऊस थोड्याच दिवसात कारखान्याला गाळपासाठी जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विघ्नहर कारखाना, भीमाशंकर कारखाना व पराग शुगर यांनी संबंधित ऊस लवकर गाळपासाठी नेला जाईल. या उसाचे पंचनामे करण्यात आले असून महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही नुकसान झाल्याची शेतकऱ्यांच्या म्हणणे आहे. या गोष्टीला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा परीसरातील आळे,राजुरी , बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी या गावांमध्ये गेल्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर विजेच्या शाॅर्टसर्कीट ने ऊस जळाला असुन या शेतक-यांणा त्यांची भरपाई मिळालेली नसुन महावितरण कंपनीकडुन भरपाई मिळावी अशी मागणी शेतक-यांणी केली आहे.