मुंबई : सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर रात्री उशीरा उद्धव ठाकरे राज भवणावर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच भाजपच्या गोटात उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप लवकरच सत्ता स्थापन करू शकते असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी 1 जुलैला पार पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोबत आठ ते दहा मंत्री शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्या अगोदर झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये औरंगाबादचे अधिकृतपणे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले.