पुणे (प्रतिनिधी):- एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने पुणे जिल्हा हादरला आहे. आपल्या दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर दाम्पत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर परिसरात घडली आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा उघडल्याने तसेच फोनही न उचलल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौघांनी पंख्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत’ असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली पती पत्नीची सही आढळून आली आहे.यातील पतीचा डिजिटल आय कार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.