Wednesday, October 23, 2024
Homeजिल्हाकामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करणेच्या लढाईसाठी सज्ज रहा - डॉ....

कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करणेच्या लढाईसाठी सज्ज रहा – डॉ. डी. एल. कराड

नाशिक : कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करणेच्या लढाईसाठी सज्ज रहा, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड यांनी केले. सिटू कामगार संघटनेच्या वतीने आज खुटवड नगर येथे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे केंद्र सरकारला रद्द करण्यास भाग पाडणाऱ्या यशस्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी सीटूच्या वतीने लाडू चे वाटप करून व फटाक्यांची आतषबाजी करून शेतकरी व जनतेच्या आंदोलनाचा विजय सोहळा साजरा करण्यात आला.

जगातील ऐतिहासिक असे आंदोलन भारतातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बोर्डरवर यशस्वी केले. अहंकारी आणि उद्दाम असलेल्या पंतप्रधान मोदींना शांततामय आंदोलनाच्या माध्यमातून तीन कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर आंदोलंकावरील सर्व केसेस मागे घेणे, शहिदांना नुकसान भरपाई व अन्य मागण्या मान्य करून घेतल्या व त्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले .

या प्रदीर्घ आणि क्रांतिकारी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल शेतकरी नेत्यांचे अभिनंदन यावेळी डॉ. कराड यांनी केले. तीन कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सिटूसह सर्व कामगार संघटनांनी सातत्याने पाठिंबा दिला व सक्रिय भागीदारी केली होती. त्यामुळे डॉ. कराड यांनी कामगार वर्गाचे ही अभिनंदन केले.

शेतकरी विरोधी कृषी कायद्याप्रमाणेच मोदी सरकारने कोविडकाळात जूने 29 कामगार कायदे रद्द करून कामगार विरोधी 4 लेबर कोड मंजूर केले आहेत व कामगारावर गुलामगिरी लादण्यात येत आहे .याबरोबरच मोदी सरकारने सर्व सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करत विक्री काढण्याचे धोरण अवलंबले आहे. रेल्वे’ विमा, बँका, एल आय सी, आणि ऑइल कंपनी या सर्व विकून बड्या कॉर्पोरेट च्या घशात घालण्यात येत आहेत. त्या  विरोधातील संघर्ष सर्व कामगार संघटना संयुक्तपणे करीत आहेत.

28 नोव्हेंबरला मुंबई येथे झालेल्या शेतकरी कामगार महापंचायत मध्ये देशपातळीवरील शेतकरी नेत्यांनीही कामगारांच्या या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. 

सरकारच्या विघातक धोरणाच्या विरोधातला लढा यशस्वी करण्यासाठी भक्कम एकजूट करावी व लढ्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.

यावेळी प्रास्ताविक सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी संतोष काकडे, तुकाराम सोनजे, निवृत्ती केदार इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कामगार वर्ग या विजय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होते.


संबंधित लेख

लोकप्रिय