रत्नागिरी : कोरोना लसीकरण मोहीमात इकडे रांग, तिकडे रांग, जिकडेतिकडे रांगच रांग! असे चित्र दिसत आहे. लसीकरण केंंद्राच्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसत आहे. म्हणून राज्यात लसीकरण केन्द्रे वाढवा अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,लसीकरण मोहीमेत 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. या वयोगटातील लोकांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंंद्रात गर्दी होत आहे. काही ठिकाणी लोकांची रांगेत तू तू मै मै होत आहे. राज्यात या लसीकरणाचा वेग बघीतला तर ही लसीकरण मोहीम वर्षभर चालेल असे वाटते. म्हणून लसीकरण केंंद्र वाढवून पुढील 2-3 महिन्यात लसीकरण पूर्ण करावेत. यासाठी शासनाने म्हणजेच आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत.
राज्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे. 0 ते 17 वयोगटातील लोकांचा या लसीकरण मोहीमेत समावेश नाही. 45 वरील वयोगटातील लोकांना यापूर्वी सक्तीने लसीकरण करण्यात आले आहे व अजूनही ते सुरूच आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 0 ते 17 या वयोगटातील लोकांची संख्या अंदाजे 4 लाख इतकी आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या 6 लाख आहे. 45 च्या वरील वयोगटातील लोकसंख्या साडेचार लाख आसपास आहे. दिनांक 7 मे 2021 रोजी जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील 12 हजार लोकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरातील लसीकरण केंंद्रात अशी एकूण 84 केन्द्रे आहेत. म्हणजे एका केंंद्रात 150 ते 200 लसीकरण झाले आहे. या पद्धतीने लसीकरण सुरू राहिले तर पहिला व दुसरा डोस यातील अंतर वाढू शकते. पहिल्या डोस घेणा-यांना दुसरा डोस घेण्यासाठी 6 महिने लागू शकतात. याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. म्हणूनच ज्या भागात लसीकरणासाठी अधिक लोक येत आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंंद्र वाढवावी. अशी मागणी पावरा यांनी शासनाकडे केली आहे.