पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिंचवडमधील काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळाने यंदाही सामाजिक भान जपत सुधारणावादी भूमिकेशी निगडीत जिवंत देखावा सादर केला आहे. आकर्षक सजावटींसह जिवंत देखाव्यातून ”लोकजागर समाज प्रबोधन” करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे भर पावसातही हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. Citizens thronged even in the rain to see the live spectacle of Hanuman Mitra Mandal of Kalbhornagar
एकीकडे बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी देखाव्याकडून दिखाव्याकडे प्रवास सुरु केला आहे. तर दुसरीकडे काही मंडळं कालबाह्य ठरत चाललेल्या जिवंत देखाव्यांची परंपरा आजही जपतायत. मंडळाचे संस्थापक विजय गुप्ता यांच्या संकल्पनेतून आसाराम आसबे यांनी या देखाव्याची मांडणी केली आहे. त्यातून रस्त्यावरील वाहतूक कोंडी, मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत जिवंत देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.
समाजप्रबोधनाचे व संस्कारांचे महत्त्व लक्षात घेतले, तर आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. सार्वजनिक गणेशोत्सवामधील चुकीच्या गोष्टींविरोधात प्रभावी समाजप्रबोधन करण्यात आले, तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकेल, अशी माहिती मंडळाचे संस्थापक विजय गुप्ता यांनी दिली.
हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष मुन्ना गुप्ता, विनोद गुप्ता, भावेश गुप्ता, रवी गुप्ता, सनी गुप्ता, राजकुमार गुप्ता आदी परिश्रम घेत आहेत.