पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे.
पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती.
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’ असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.
समाधान आवताडे यांनी 3716 मतांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे.
भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू होती. कधी राष्ट्रवादी पुढे तर कधी भाजप आघाडी घेत होती. एकूण 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. 7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले.