मुंबई – राज्यात विदर्भ व मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार असली तरी या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही. (soyabean price)
राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु ठेवली पाहिजेत, तसेच खरेदी केंद्रांची संख्या वाढवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
सोयाबीन खरेदी आणि त्याचे दर यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३० लाखांहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, यातील साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभरातील विविध खरेदी केंद्रांवर नोंदणी केली आणि त्यातील साधारणपणे तीन- तीनसाडेतीन लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.
किमान ६ हजार रुपये बाजार भाव मिळत नाही तरी शेतकऱ्यांनी बाजारात मिळेल त्या किंमतीला सोयाबीन विकले आहे. खुल्या बाजारात व कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ३५०० ते ४००० हजार रुपये भाव मिळत आहे. तर हमी भाव ४८५१ रुपये आहे. (soyabean price)
सोयाबीनसाठी एकूण उत्पादन खर्च व बाजारातील भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी खरेदी केंद्रांची सख्या वाढवावी, संपूर्ण सोयाबीन खरेदी होईपर्यंत तोपर्यंत खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत.
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु केल्यानंतर सुरुवातीला साठवणुकीचा प्रश्न उभा राहिला आहे, त्यानंतर बारदाणा नसल्याची सबब सांगण्यात आली. सरकारच्या खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
६ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवली असली तरी अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आधीच भाव कमी त्यात खरेदी केंद्रे बंद केली तर शेतकऱ्यांवर मोठे संकट येईल.
भाजपा युती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले पण ते पाळले नाही. सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.