मुंबई:-भरमसाठ विद्युत बिलांबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्या तातडीने दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महावितरण कंपनीला दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एम. बी.वराळे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
ताळेबंदीच्या काळात विद्युत नियामक मंडळाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने प्रत्यक्ष मिटर रीडिंग न घेता सरासरी वीज बिलं दिली होती. ज्यामध्ये भरमसाठ वाढ झालेली होती. त्यामुळे राज्यभरातून या वीज बिलांविरोधात तक्रारी वाढत होत्या. दरम्यान, ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी महावितरणने त्रिस्तरीय तक्रार निवारण मंच नेमला आहे.ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना या मंचाची लिंक उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयाने महावितरण आणि महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाला दिले आहेत.