मुंबई : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत च्या वाटाघाटी निष्फळ ठरल्याने ४ डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याची माहिती कृती समितीच्या नेत्या शुभा शमीम यांनी ‘महाराष्ट्र जनभूमी’ शी बोलताना दिली.
दिनांक 3 जानेवारी रोजी आझाद मैदानावरील कृती समितीच्या ठिय्या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन आलेले शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चा करण्यासाठी पाचारण केले. शिष्टमंडळात एम.ए.पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर व अप्पा पाटील यांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांशी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅच्युइटी, मानधनवाढ, मासिक पेन्शन, मोबाईल, अंगणवाड्यांची भाडेवाढ व आहाराच्या दरात वाढ या विषयांवर सुमारे पाऊण तास चर्चा झाली. मानधनवाढीच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी पूर्णतः नकारात्मक भूमिका घेऊन मागणी फेटाळली त्यामुळे वाटाघाटी निष्फळ ठरल्या.
सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युइटी बाबत दिलेल्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कामासाठी मिळणारा मोबदला हे वेतनच आहे. त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन, महागाई भत्ता ग्रॅच्युइटी आदी लाभ लागू केले पाहिजे या कृती समितीच्या आग्रही भूमिकेवर या निकालाचा अभ्यास करावा लागेल असा त्यांनी पवित्रा घेतला. बाकी थकित प्रश्नांवर प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल असे ते म्हणाले.
परंतु मानधनवाढीच्या मागणीबाबत त्यांनी दिलेल्या नकारामुळे चर्चा शेवटी निष्फळ ठरल्याने संप मागे घेण्याबाबत कृती समितीने असमर्थता दर्शवली. त्यामुळे संप सुरू ठेवण्याचा व आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे. ४ जानेवारी रोजी देखील आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे व सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
