पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथे तक्षशिला बुद्ध विहार मध्ये आज आंतरजातीय-धर्मीय विवाहितांचा सत्कार सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आकुर्डी शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रमुख पाहुणे आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी जोडप्याचे स्वागत करताना सांगितले की, सहजातीय-धर्मीय लग्न ही अनेकदा मुलामुलींच्या इच्छेव्यतिरिक्त लावली जातात आणि हा हजारो वर्षांपासून चालू असलेला रिवाज आहे. त्यामुळे आंतरजातीय लग्न केली तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हटले जाते, म्हणजे धर्म काही इतकी तकलादू गोष्ट आहे का ? मानव जात हीच एक असून ती समान आहे, असे महामानवांनी सांगितले आहे. आंतरजातीय धर्मीय विवाह केल्यास जीवे मारले जाते, जातीचे प्रमुख दबाव आणतात. आंतरजातीय लग्न ठरवून होतील तेव्हा समाजपरिवर्तन होईल आणि जातीयद्वेष कमी होण्यास सुरुवात होईल. स्वतःला परिवर्तनवादी समजणारे अनेक लोकही अशा विवाहांच्या मागे उभे राहत नाहीत”, असे मत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी अमृता भोसले – आशिष वानखेडे, गिता हरावडे – रवि भिसे, ज्योती डखरे – अभय लांडगे, पूजा कलवले – अजिंक्य सांडभोर, रेणुका बनसोडे – ईश्वर राठोड, अश्विनी सुर्यवंशी – गोपीनाथ गायकवाड, शहेनाज कुरणे – राधेश्याम धाडगे, दिव्या वाघमोडे – रियाझ शेख, रुपाली बोरकर – दर्शन देवकांत या जोडप्यांचा ट्रॉफी, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. योगेश गाडेकर (महाराष्ट्र अंनिस आकुर्डी) हे होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांती दांडेकर, सूत्रसंचालन ऍड.नितीन कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास ऍड.मनीषा महाजन, ऍड रमेश महाजन, अरुणा यशवंते, संजय बारी, ऍड.भूषण महाजन, वनिता फाळके, विशाल विमल, प्रताप सोनवणे, मंगला मुनेश्वर उपस्थित होते.