Saturday, February 15, 2025

Alandi : ज्ञानेश्वर प्राथमिक प्रशालेत मातृपितृ पूजन सोहळा, बक्षिस वितरण उत्साहात

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने प्रशालेत मातृ – पितृ पूजन सोहळा आणि बक्षिस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. (Alandi)

या प्रसंगी ह.भ.प.पंढरीनाथ महाराज आरु, माजी विद्यार्थीनी जिजाऊ हॉस्पिटल – मोशी येथील डॉ. हर्षदा शांताराम भिवरे, एस.एस.पिंगळे असोसिएटसचे सागर सुभाष पिंगळे, माजी विद्यार्थीनी साक्षी अरविंद शिंदे (ऑस्ट्रेलिया,एम.सी.एस.) संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, श्रीधर कुऱ्हाडे, बाबूलाल घुंडरे, पत्रकार दादासाहेब कारंडे, पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विवेक चव्हाण, सदस्य संतोष इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. ॥मातृ देव भव, पितृ देव भव|| या उक्तीप्रमाणे आपण आई- वडिलांचे महत्त्व जाणून त्यांच्याबद्दल आदर भाव व्यक्त केला पाहिजे, यासाठी संस्कारक्षम सोहळ्याचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये दाखवलेल्या कौशल्याचे कौतुक करण्यासाठी बक्षिस वितरण केले जाते असे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. (Alandi)

विजेत्या खेळाडूंना, संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी यांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थी फक्त उच्च शिक्षित असून चालत नाही तर सुसंस्कारी असले पाहिजे आणि प्रशालेत राबवल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांमधून संस्कारक्षम विद्यार्थी तयार होत असतात असे विचार व्यक्त केले.


विवेक चव्हाण यांनी प्रशाला गेली बारा वर्षे असा संस्कारक्षम उपक्रम राबवत असल्याने विद्यार्थी पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळणार नाहीत अशा शब्दात प्रशालेचे कौतुक केले. पत्रकार दादासाहेब कारंडे यांनी आई वडिलांबरोबरच गुरुजनांचे देखील पूजन करावे असा भाव व्यक्त केला.

डॉ.हर्षदा भिवरे हिने तिला मिळालेल्या यशाबद्दल प्रशालेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सध्या ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत असलेल्या साक्षी शिंदे हिने तिच्या यशाचे प्रशालेला श्रेय दिले. मुलांचा कल बघून त्यांना क्षेत्र निवडण्यास मार्गदर्शन करावे अशी पालकांकडून अपेक्षा व्यक्त केली. शालेय शिक्षणाबरोबर इतर कला विकसित करून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व अष्टपैलू करण्याची गरज या आधुनिक युगात असल्याचे मत व्यक्त करत सागर पिंगळे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरीनाथ आरु यांनी आई वडिलांचे नित्य पूजन करून आयुष्यात यश संपादन करून सर्वत्र नाव लौकिक मिळवून आई वडिलांना मान द्यावा अशा भावना व्यक्त केल्या. भावपूर्ण वातावरणात व आई वडिलांच्या विषयीच्या गाण्यांच्या पार्श्वभूमीत मुलांनी पालकांचे पूजन केले. दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन निशा कांबळे यांनी केले.

पंढरीनाथ महाराज यांच्या सुमुधर आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles