पुणे : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे थंडी कमी झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये अचानक गारवा कमी झाल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे.
मागच्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढला आहे. सकाळी धुके, दुपारी उन्हाचा तडाखा तर सध्याकाळी दमट वातावरणाचा फटका लोकांना बसत आहे. दरम्यान या वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने पावसामुळे यावर परिणाम होऊ शकतो.
अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान गोवा, कोकणासह, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यात आकाश निरभ्र होत आहे. यातच किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला असून, दुपारच्या वेळी उन्हाचा कायम आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी अधिक होत आहे. हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात नीचांकी 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 9.3 अंश सेल्सिअस, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उर्वरित राज्यात किमान तापमानातील वाढ कायम असून, बहुतांशी ठिकाणी पारा 11 ते 24 अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान 28 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास कायम आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा जाणवत आहे. राज्यात आज (ता. 29) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


