छत्रपती संभाजीनगर : आज महाविकास आघाडीची विराट वज्रमूठ सभा संभाजीनगर येथे पार पडली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदींसह इतर नेत्यांनी सभेला मार्गदर्शन केले.
यावेळी सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभेला संबोधित केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी महाविकास आघाडी आपल्या जीवाचे रान करेल. सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचा कणा या नात्याने ते लढतील याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही.
भारतीय संविधानाचा आदर देशातील तमाम जनतेने केला पाहिजे. परंतु सध्या त्याला तिलांजली देण्याचे काम झाले आहे. ज्या पद्धतीने सरकार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. जर हे असचं घडतं राहिले तर देशातमध्ये देखील व राज्यामधील देखील स्थिरता राहणार नाही. जी देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारी नाही. त्याच्यातून उद्योगधंदे येणार नाही. लोकांना जे विश्वासाचे वातावरण हवे ते मिळणार नाही. प्रशासनालाही कोण कधी येईल आणि कोण कधी जाईल याचा विश्वास नसेल तर प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने चालणार नाही. पक्षांतर कायदा असला तरी एक गट वेगळा झाला व त्याला निवडणूक आयोगाने परवानगी दिली. निवडणूक आयोग असे निर्णय देयला लागले तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो की कसं होणार पुढे? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष आहे. न्यायदेवतेवर आपल्या सर्वांचा विश्वास असून न्यायदेवता योग्य निर्णय देईल यावर माझा विश्वास आहे, असे अजित पवार म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्रासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ १३ मिनिटे वेळ देतात आणि ते निघून जातात. एवढी मराठवाड्याची उपेक्षा यापूर्वी कधी झाली नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे वर्ष साजरे करण्यात यावे. यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावे. मुक्तीसंग्रामचा इतिहास नव्या पिढीसमोर यावा अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. परंतु याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. याची नोंद मराठवाड्यातील जनतेने घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
आज गौरव यात्रा काढल्या जात आहे. माजी राज्यपालांसह पक्षातील नेते व प्रवक्त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक दिगज्जांचा यांचा अपमान केला. त्यावेळी या सरकारची दातखिळी बसली होती का, का नाही गौरव यात्रा काढल्या असा सवालही अजित पवार यांनी केला.
आम्हाला सर्व महापुरुषांपबद्दल आदर आहे. आम्ही सर्व महापुरुषांसमोर नतमस्तक होतो. त्यांनी त्यावेळी काम केले म्हणून आपण हे दिवस पाहतो. त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. मधल्या काळात काही स्वातंत्र्यवीर सावरकारांबद्दल काही बोललं गेले. त्या नंतर सर्वांनी त्याबाबत एक भूमिका घेऊन वातावरण शांत केले. पण जाणीवपूर्वक केंद्रीय दोन मंत्री व राज्यातील तीन मंत्री गौरव यात्रा काढत आहेत. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण तुम्ही जे दुटप्पी राजकारण करतात. ते कधीच महाराष्ट्र विसरु शकत नाही, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
सुप्रीम कोर्टाने या सरकारबद्दल शक्तीहीन, नपुंसक म्हणून मत व्यक्त केले. या सरकारला जनाची नाही पण मनाची तरी वाटायला हवी. या पद्धतीने ही लोकं सरकार चालवत आहे. अधिवेशनाच्या काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर कांदा उत्पादक, कापूस, सोयाबीन, केळी, संत्री, द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवला. पण सरकारने त्यांनी ठोस मदत केली नाही. शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने चालवली आहे. या सरकारच्या काळात रोज ९ शेतकरी आत्महत्या करतो. महागाई वाढली आहे. आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. बेरोजगारी वाढत आहे. सरकार म्हणतं की ७५ हजार सरकारी नोकरी देणार, कधी देणार नोकऱ्या.. तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
केवळ महागाई व बेरोजगारी वरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी वेगवेगळ्या घटना घडल्या व घटना घडत आहेत. हे वातावरण असेच राहिले कोणीही गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करणार नाही. हे राज्याच्या विकासासाठी योग्य नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.