संघटना टिकवणे अवघड आव्हान समोर आहे
चाकण औद्योगिक क्षेत्रात कामगार मदत,सल्ला,मार्गदर्शन केंद्रे स्थापन करणार
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:चाकण किंवा पुणे औद्योगिक क्षेत्रात ईएसआयचे हॉस्पिटल,एखादीओपीडी,सरकारमान्य तातडीक अपघात उपचार सेवा,क्रिटिकल अपघात प्राथमिक उपचार केंद्र,कामगार कल्याण केंद्रे यासारखी कोणतीही सुविधा चाकण औद्योगिक क्षेत्रात नाही,
अपघात झालेल्या एखादा कामगार पिंपरी चिंचवड येथे नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका सेवा नाही,सरकारची लेबर ऑफिसेस,पीएफ कार्यालये पुणे,आकुर्डी येथे आहेत.औद्योगिक कंपन्या असलेल्या चाकण मध्ये कामगारांसाठी गृहनिर्माण धोरण नाही.हजारो कामगारांना पुरेशी सार्वजनिक बससेवा नाही.त्यामुळे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून चाकण मध्ये आम्ही मदत केंद्रे स्थापन करण्याचा विचार सुरू केला आहे-असे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष जीवन येळवंडे येळवंडे यांनी चाकण येथे कामगारांच्या प्रश्नावर माहिती देताना सांगितले.

—-संघटित कामगारांचे हित साधण्यासाठी व्यवस्थापना बरोबर वाटाघाटी करताना संयम,सहनशक्ती,कंपनीच्या नफ्या तोट्याचा आणि बाजारातील स्पर्धेचा अभ्यास करावा लागतो–
कामगारांच्या विविध आर्थिक वेतनवाढीचे करार,मागण्या व इतर सोयी सवलतीसाठी वाटाघाटी करताना कोणत्याही कायद्याने कामगार किंवा कामगार संघटनांना कायदेशीर हमी दिलेली नाही.
योग्य मोबदला,आजारी रजा,सुट्टीतील वेतन,ओव्हरटाइम वेतन,आरोग्य सेवा कव्हरेज आणि सेवानिवृत्ती योजना यासारखे फायदे,कामगारांचे हक्क जसे की,तक्रार लवादाचा अधिकार,अयोग्य समाप्तीपासून संरक्षण,(केवळ कारण),आणि ज्येष्ठतेचे अधिकार कोणत्याही गोष्टीची कायद्याने कोणत्याही कामगाराला हमी दिलेली नाही,कामगार आणि त्यांचे त्यांचे मालक किंवा नियोक्ता यांच्यातील कराराद्वारे सर्व वाटाघाटी करणे आवश्यक असते.असे स्वाभिमानी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते जीवन येळवंडे यांनी चाकण येथे सांगितले.

कंत्राटी पद्धतीमुळे संघटना टिकवणे अवघड आव्हान आहे
कंत्राटी पद्धतीमुळे संघटना टिकवणे आणि कंत्राटी कामगारांची संघटना बांधणे हे खूप अवघड आव्हान मागील 20 वर्षात कामगार संघटना समोर आहे.चाकण औद्योगिक क्षेत्रात 2013 सालापासून आम्ही मध्यम उद्योगात कंत्राटी कामगारांना संघटित करण्यासाठी स्वाभिमानी श्रमिक संघटनेच्या माध्यमातून काम करत आहोत,तात्पुरत्या स्वरूपाच्या कामासाठी ठेकेदार कंत्राटदार नेमून अस्थायी कामगार नेमावेत यासाठी कंत्राटी कामगार कायदा 1970 साली आला.
मात्र आता मोठ्या कंपन्या,त्यांच्या पुरवठादार(व्हेंडर्स) कंपन्या मध्ये हजारो कंत्राटी कामगारामार्फत पूर्ण प्रोडक्शन काढून घेतले जात आहे.इथे कमी वेतनात राबणाऱ्या श्रमशक्ती मूळे मागील दोन दशकात पर्मनंट कामगारांची संख्या अल्प राहिली आहे.
नाशिक,चाकण,रांजणगाव आदी एमआयडीसी मध्ये आम्ही आमचे 4 हजाराहून जास्त सदस्य आहेत. आम्ही एकूण 40 वेतन वाढीचे करार 2013 पासून केलेले आहेत.मी स्वतः कंत्राटी कामगार होतो,तिथे युनियन बांधून संघर्ष केला,आणि कायम कामगार केले,अशावेळी कंपनी व्यवस्थापना विरोधात आमच्या संघटनेला आंदोलने करावी लागली.असे जीवन येळवंडे यांनी सांगितले.
विद्यमान काळात बेरोजगारी,औद्योगिक स्पर्धेतील कॉस्ट रिडक्शन,निष्क्रिय करण्यात आलेले कामगार कायदे यामुळे हजारो असंघटित व विखुरलेल्या कंत्राटी कामगारांच्या संघटना बांधण्यासाठी मोठे टीमवर्क व तळमळीच्या कार्यकर्त्याची कमतरता आहे.अन्यथा कामगार संघटना टिकवणे अवघड आव्हान समोर आहे,असे कामगार नेते जीवन येळवंडे यांनी सांगितले.

Delloreto India pvt. Ltd.व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील वेतनवाढ करार तपशील
यावेळी त्यांनी Delloreto India pvt. Ltd.व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ करारा विषयी माहिती दिली ती खालील प्रमाणे


दिनांक ०३/०२/२०२४ रोजी चाकण औद्योगिक वसाहाती मधील भांबोली येथील Delloreto India pvt. Ltd. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या वेतनवाढ करार संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे,प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे,कंपनीचे डायरेक्टर कमल वाधवा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णत्वास आला आहे.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे
०१) एकूण पगारवाढ :- १८५००/- (अठरा हजार पाचशे रुपये)
पगाराचा रेशो:पहिल्या वर्षी ६०% दुसऱ्या वर्षी २०% तिसऱ्या वर्षी २०% मिळणार.
०२) कराराचा कालावधी:- ०१/०१/२०२३ ते ३१/१२/२०२५ या तीन वर्षांचा राहील.
०३) मेडिक्लेम पॉलीसी:- कुटुंबासाठी ४०००००/- रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई-वडील यांचा समावेश करण्यात येणार आहे.
०४) मृत्यू साहाय्य योजना
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला म्हणून २५०००००/- (पंचवीस लाख) रुपये पॉलिसी कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
०५) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी:- २४ तास कव्हर असणारी १००००००/- (दहा लाख) रुपयांची पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
०६) सूटया
A) PL – २१,
B) SL – ०९
C) CL – ०९
D) PH – १०
E) मतदानाची सुट्टी:- सरकारी आदेशानुसार राहील,
F) दुखवटा सुट्टी:- कामगाराच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, मुले सख्खा भाऊ व बहीण यापैकी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास व्यवस्थापन त्या कामगारास त्याच्या गावापर्यंत जाण्यासाठी विनाशुल्क वाहतूक व्यवस्था करून देण्याचे मान्य झाले आहे.
G) पितृत्व रजा:- सभासद कामगारास मुलगा अथवा मुलगी झाल्यास त्या कामगारास पितृत्व रजा म्हणून पाच दिवस सुट्टी देण्याचे मान्य झाली आहे.
०७) दिवाळी बोनस:-
A) सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा १५०००/- देण्यात येईल.
B) दिवाळी दसरा भेटवस्तू:-
दसऱ्याच्या दिवशी एक किलो मिठाई, दिवाळीला एक किलो ड्राय फ्रूट तसेच एक भेटवस्तू देण्याची मान्य झाले आहे.
०८) सेवा कायम करणे:-कंत्राटी कामगारांमधून ३४ कामगार कायम करण्याचा निर्णय मान्य झाला आहे
०९) मासिक हजेरी बक्षीस:-ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १५००/-( एक हजार पाचशे) रुपये देण्यात येईल.
१०) सेवा बक्षीस:-
A) ५ वर्षे नोकरी झाल्यास ५०००/-,
B ) १० वर्षे नोकरी झाल्यास १००००/-,
C) १५ वर्षे नोकरी झाल्यास १५०००/-
११) बक्षीस योजना :-कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस देण्याचे मान्य.
१ ते ७ वी:- ७०% ते ८०% – ५००/- रुपये,
८०% ते ९०% – १०००/- रुपये
आणि ९१% च्या पुढे २०००/- रुपये,
८ वी ते १२ वी:- ७०% ते ८०% – १०००/- रुपये,
८१% ते ९०% – २०००/-,
आणि ९१% च्या पुढे ३०००/- रुपये,
१२) वैयक्तिक कर्ज सुविधा:- प्रत्येक कामगारास CTC पगाराच्या १.५ पट देण्याचे मान्य, तसेच यापेक्ष्या जास्त रक्कम हवी असल्यास एकत्रित चर्चा करून मदत करण्यात येईल.
१३) ड्रेस:-
a) पूर्ण ड्रेस – २,
b) शूज – उच्च प्रतीचा देण्याचे मान्य,
c) हिवाळी व पावसाळी जर्किंग – तीन वर्षाला एक मिळणार
१४) गुणवंत कामगार पुरस्कार:- प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना प्रत्येकी ५०००/- ( पाच हजार) रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य,
१५) पाळी भत्ता:- तिसरे पाळीसाठी १००/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.
१६) कॅन्टीन आणि बस सुविधा:-
A) नाश्त्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. नाश्त्यासाठी आठवड्यातून दोन दिवस अंडी आणि एक ग्लास दूध देण्याची मान्य झाली आहे.
B) जेवणामध्ये आठवड्यातून एक दिवस अंडी व एक दिवस चिकन असे दोन दिवस नॉनव्हेज देण्याची मान्य झाली आहे.
C) सर्व कामगारांना बस सुविधा किंवा कंपनी पॉलिसी प्रमाणे कार सुविधेचा फायदा मिळणार.
कॅन्टीन व बस या दोन्ही सुविधा 100% फ्री देण्याचे मान्य
१७) नैसर्गिक आपत्ती:- कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा कोविड सारखी परिस्थिती उद्भवल्यास व्यवस्थापन पूर्ण वेतन देण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्यास सहमत आहे.
१८) प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ७ महिन्याचा पगारामध्ये देण्यात येणार आहे.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले,उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, चिटणीस रघुनाथ मोरे,खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर,दत्तात्रय गवारी,प्रशांत पाडेकर,रविंद्र भालेराव, महादेव येळवंडे, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष कमलेश भोकसे, उपाध्यक्ष धनेश निघोजकर, सरचिटणीस पांडुरंग मराठे, खजिनदार बाबासाहेब दरेकर,व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट कमल वाधवा साहेब, सी.ओ.ओ. मनोज गर्ग साहेब, श्रीमती. धरणी सतिशकुमार, एच आर हेड रणपाल सिंह साहेब, एच. आर. मॅनेजर ओंकार चव्हाण साहेब, यांनी सह्या केल्या.
प्रास्ताविक एच.आर. मॅनेजर ओंकार चव्हाण साहेब तसेच सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्येक्त केला.