हडपसर / डॉ.अतुल चौरे : सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुणे व रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय काव्य संमेलन स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. District level poetry competition concluded in S M Joshi College
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रो. डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रो. डॉ. अभिजीत कुलकर्णी उपस्थित होते. तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ.संदीप सांगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागातील डॉ. राजेंद्र घोडे व महात्मा फुले महाविद्यालय पिंपरीचे आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रो.डॉ.नीलकंठ डहाळे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.किशोर काकडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रो.डॉ. सदानंद भोसले म्हणाले की, कविता म्हणजे शब्दांची तोड-फोड नाही तर ती एक नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. देशाच्या विविधतेत एकता ठेवणे व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम साहित्यिक करीत असतात. कविता मानवतेचा संदेश देते. त्यामुळे अशा स्पर्धांच्या माध्यमातून नव समाजाची निर्मिती होईल. असे प्रतिपादन प्रो.डॉ. सदानंद भोसले यांनी केले.

मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ.संदीप सांगळे म्हणाले की, कविता ही मानवी मनाचा तळ शोधते. कवितेच्या माध्यमातून मानवी मनातील उस्फुर्त भावना व्यक्त होतात. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की, काव्यसंमेलनांतून नवकविंना कविता सादरीकरणाची संधी मिळते. त्यामधून नव युवा साहित्यिक निर्माण होतात. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्यासाठी व त्यांचा सर्वांगिन विकास करण्यासाठी अशी काव्यसंमेलने भरवायला हवीत. कवितेमधून युवा मनाची स्पंदने व्यक्त होतात. मराठी साहित्यामध्ये कविची दीर्घ परंपरा लाभलेली दिसते. जुन्या काळी आई ज्या वेळी जात्यावर ओवी, अमे अभंग म्हणायची त्या वेळी घरातील लहान थोर ती गाणी ऐकत असत त्यातुन घरातील सर्वांवर संस्कार होत. असे मत प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, पाहुण्यांची ओळख मराठी विभागप्रमुख डॉ.अतुल चौरे यांनी तर आभार प्रा. ऋषिकेश खोडदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, डॉ.निशा गोसवी, डॉ.शहाजी करांडे, प्रो.डॉ.एकनाथ मुंढे, डॉ.ज्योती किरवे, प्रा.महेश देवकर, प्रा.अजित जाधव व प्रा.गजानन घोडके यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनंजय भिसे व प्रा. काजल गौडदाब, प्रा.मेघा तळपे यांनी केले.
