पिंपरी चिंचवड : शहरातील रुग्ण संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. प्रशासनाने जनतेला सहकार्य करण्याचे केलेल्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत आहेत. सायंकाळी ६ पासूनच्या संचारबंदीला व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे. आकुर्डी दत्तवाडी, विठ्ठलवाडी, निगडी या दाट लोकवस्तीच्या परिसरात सायं ५ वाजल्यापासून रस्ते निर्मनुष्य व्हायला लागले आहेत. पोलिसांनी कोठेही बळाचा वापर केलेला नाही. शहरातील जनतेला सरकारच्या आदेशातील गांभीर्य समजले आहे. उचभ्रू आणि कामगार वस्तीत संचार बंदी आणि जमाव बंदीचे तंतोतंत पालन केले जात आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व गोष्टींचे आकलन करून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क आणि सँनिटायझर वापरावं. कोरोना साथीची परिस्थिती सध्या गंभीर आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर बेड मिळणेही अवघड होणार आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडावी.
सुपर स्प्रेडर (वाहन चालक, शिक्षक, कर्मचारी, दुकानदार, सुरक्षा रक्षक आणि ज्या नागरिकांचा अनेक नागरिकांशी कामानिमित्त संपर्क येतो असे नागरिक) यांचे लसीकरण प्राधान्याने करणार. लसीकरण केंद्रावरून घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या आजूबाजूला ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्यांना लसीकरणासाठी आणावे. लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावं. त्यांचे लसीकरण करण्यासाठी मदत करावी.
कोरोनाबाबत तरुणांचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. मला काहीच होत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करा. काहीही त्रास होत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. त्याचा इतरांना मोठा तोटा होऊ शकतो. सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत लसीकरण केले जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.