Wednesday, April 24, 2024
Homeजिल्हाजागतिक आदिवासी दिन विशेष जमीन हक्क परिषद संपन्न, लढा तीव्र करण्याचा निर्धार

जागतिक आदिवासी दिन विशेष जमीन हक्क परिषद संपन्न, लढा तीव्र करण्याचा निर्धार

मुरबाड (ठाणे) : अखिल भारतीय किसान सभा आयोजित जागतिक आदिवासी दिन विशेष जमीन हक्क परिषद, मुरबाड येथील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सभागृह येथे दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या परिषदेत आदिवासी, दलित, मराठा, आगरी, कुणबी या सर्व समाजांतून शेतकरी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.

यावेळी बोलताना किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माकप चे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे म्हणाले, १९४३-४४ साली कॉम्रेडस् शामराव आणि गोदावरी परुळेकर यांनी मुरबाड, कल्याण आणि शहापूर तालुक्यात किसान सभेची मुहूर्तमेढ रोवली होती, आणि ७ जानेवारी १९४५ रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे स्थापना अधिवेशन येथून जवळच असलेल्या टिटवाळा येथे झाले होते. त्याच्या अनेक दशकांनंतर मुरबाड तालुक्यात किसान सभेची या परिषदेतून पुन्हा सुरुवात झाली.


परिषदेचे उद्घाटन आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले. यावेळी आ. निकोले म्हणाले, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत जनतेने सरकार विरोधात आवाज बुलंद करण्याची गरज आहे. तसेच जमीनीच्या हक्कासाठी संघर्ष तीव्र करण्याचे आवाहनही उपस्थितांना केले.

यावेळी वन हक्क कायदा : अंमलबजावणी आणि सद्यस्थिती यावर ठाणे पालघर जिल्हा सचिव कॉ. किरण गहला मार्गदर्शन केले, तर जमीन अधिग्रहण प्रक्रिया: इतिहास आणि वर्तमान यावर किसान सभेचे राज्य समितीचे सदस्य कॉ. संजय ठाकूर यांनी संबोधित केले. तसेच प्रकल्प, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा : स्वरूप आणि वास्तव यावर माकपचे रायगड जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे यांनी तर अन्न सुरक्षा कायदा आणि सरकारची जनता विरोधी भूमिका यावर जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस कॉ. प्राची हातिवलेकर यांनी संबोधित केले. इको सेन्सिटिव्ह झोन – स्वरूप आणि स्थानिकांचे हक्क यावर माकपचे राज्य समितीचे सदस्य कॉ. भरत वळंबा यांनी दाहकता विषाद केली.


या परिषदेचे स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष कॉ. पी. के. लाली यांनी केले, प्रास्ताविक कॉ. डॉ. कविता वरे यांनी केले, सूत्रसंचालन कॉ. दिलीप कराळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन कॉ. दिनेश जाधव यांनी केले.
या परिषदेत जमीन हक्क चळवळीची भूमिका मांडून पुढील काळात तीव्र लढा उभारायचा निर्धार करण्यात आला.

या परिषदेने २५ जणांची अखिल भारतीय किसान सभा, मुरबाड तालुका समिती निवडली. कॉ. दिनेश जाधव यांची अध्यक्षपदी, कॉ. डॉ. कविता वरे यांची सचिवपदी, तर ४ उपाध्यक्ष व ४ सहसचिव निवडण्यात आले, तसेच १५ जण समिती सदस्य म्हणून निवडण्यात आले.

या परिषदेमध्ये कॉ. डॉ. कविता वरे यांनी जमीन मालकी हक्क विषयावर संशोधन करून भागीदारी तत्त्व संशोधित केले म्हणून भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) दक्षिण ठाणे शहर तालुका समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय