पिंपरी चिंचवड : महिलांचे मानसिक आणि शारीरिक अनाआरोग्य असते, त्यामुळे महिला अंधश्रश्रद्धेच्या बळी ठरतात असे प्रतिपादन ऍड. मनीषा महाजन यांनी केले. त्या ‘महिला आणि अंधश्रद्धा’ या विषयावर जागर विवेकाचा लाईव्ह कार्यक्रमात आकुर्डी येथे बोलत होत्या.
महिलांचे समाजातील आणि कुटुंबव्यवस्थे मधील दुय्यमत्व, तसेच रुढी परंपरेनेतून आलेले कर्मकांड, उपवास – तपास, घरातील कामाचा ताण, यामुळे महिलांचे मानसिक आणि शारीरिक अनाआरोग्य असते आणि त्यामुळे महिला अंधश्रश्रद्धेच्या बळी ठरतात.
भारतात आणि महाराष्ट्रात उपवास, व्रत, वैकल्ये ही अधिकतर महिलांनाच करावी लागतात किंबहुना रुढी-परंपरांनी तसेच पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेने अनेक शतकांनपासून महिलांवर हे लादलेले आहेत. त्या त्यांचे कर्तव्य समजून पर पाडत असतात. यात काही गैर आहे असे त्यांना वाटतही नाही.
उपवास, कर्मकांडे खरंच करायची गरज आहे का? याचा विचार त्या करत नाही. भारतीय समाज व्यवस्थेतील जाती, दुय्यमत्वामुळे स्त्रीला शिक्षणापासून सुरवातीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. संसार शेतीची कामे, मुलांचे संगोपन, दैनंदिन कामाच्या व्यापात स्त्री अडकली आणि तिचे जग संकुचित झाले. भारतीय संविधानात स्त्रियांना सामान हक्क प्रदान करण्यात आले आहे.
सभोवताली घडणाऱ्या दुर्दैवी घटना का घडतात त्याची कारणे काय? याचा शोध विवेकी बुद्धीने करावा. मला मानसिक आणि शारीरिक त्रास का होतो? मला इतके कष्ट करूनही सुख मिळत का नाही? इ. प्रश्नांची उत्तरे स्त्रीला तिच्या सामाजिक दर्जामुळे मिळत नाहीत.
ऍड मनीषा महाजन यांनी सांगितले की जादूटोणा, तांत्रिक, मांत्रिक यांच्या नादाला लागल्या मुळे हजारो स्त्रियांचे लैंगिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण झाले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इ. धर्मातील अनेक बुवा – बाबांनी हजारो स्त्रियांचे प्रचंड नुकसान केले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन १९८९ पासून चळवळ अशा दांभिक बुवा बाबांपासून सामान्य माणसाचे तसेच महिला आणि मुलांचे शोषण होऊ नये यासाठी चालविली आहे. स्त्रियांचे शारीरिक, मानसिक आर्थिक शोषण बंद करायचे होते व आहे. १८ वर्षे संविधानिक मार्गाने जादूटोणाविरोधी कायदा व्हावे, यासाठी लढा दिला. अखेर डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर सरकारने कायदा पारित केला. अनेक बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिक यांना जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आले. या कायद्यामुळे अंधश्रद्धा जोपासून समाजामध्ये अद्भूत शक्ती असल्याचे खते दावे करणारे, फसवणूक करणारे, शोषण करणारे अनेक बुवा तुरुंगात गेले आहेत.
ऍड. मनीषा महाजन यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने सर्वाना धर्म उपासना आणि प्रार्थना यांचे स्वातंत्र्य दिले आहे, स्त्रियांना कोणत्याही कारणाने प्रार्थना करण्यास कोणी अडथळा आणू शकत नाही, मात्र त्याचा आधार घेऊन कर्मकांडे, उपवास – तापास केली जातात. पौष्टीक आहार न घेतल्याने तिच्या तब्येतीची हेळसांड होते, अनेक वेळा स्त्रिया तद्न्य डॉक्टरकडे जात नाहीत, आपल्याकडे प्रत्येक महिन्यात विशिष्ट वारी महिलांनी उपवास करावे, वेगवेगळी कर्मकांडे करावीत अशी परंपरा आहे. त्यामुळे महिला आपसूकच अंधश्रद्धे कडे झुकतात व त्यांचे प्रमाण वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकी विचाराने स्त्रियांनी कालसुसंगत आणि नको अडलेल्या रुढी परंपरांना धीटपणे नाकारावे. फुले, शाहू, आंबेडकर, शिवराय, तुकाराम महाराज, गाडगे महाराज यांच्या विचार आत्मसात करून स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध कार्यक्रम घेत असते.
महिलांनी विवेकी विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून स्वतःचा व समाजाचा विकास घडवून आणावा हीच अपेक्षा.