नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत मद्रास उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेच्या सुनावणी वेळी न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना निवडणूक आयोगाने प्रचारसभा घेण्यास परवानगी दिली होती त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला एकमेव निवडणूक आयोग जबाबदार असून खूनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फैलावर घेत कानउघाडणी केली होती.
त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या खूनाच्या गुन्हा दाखल करण्याच्या विधानाला घेऊन सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच सुनावणी वेळी न्यायालयाकडून व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखण्याची विनंती करण्यात आली होती.
त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सुनावणी करत असताना न्यायालय जी मते व्यक्त करतं त्यांचं वार्तांकन करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही असे म्हणाले.
पुढे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, अंतिम आदेशाप्रमाणेच न्यायालयात जी चर्चा होते, ती लोकहिताच्या दृष्टीनेच असते. न्यायालयातील चर्चा ही वकील आणि न्यायाधीशांतील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यामध्ये माध्यमे शक्तिशाली पहारेकरी आहेत,’ असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.