Wednesday, January 15, 2025
HomeNewsजनमत : वास्तववादी बिरसा पाहिजे - विकास भाईक

जनमत : वास्तववादी बिरसा पाहिजे – विकास भाईक

आज 9 जून आहे आणि आज बिरसा मुंडा यांचा स्मृती दिवस आहे. आजच्या दिवशी 9 जून 1900 रोजी या देश्याच्या थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा हे तुरुंगात असताना ब्रिटिश सरकारने त्यांवर अनेक अन्याय अत्याचार करून त्यांचा शेवट केला होता. परंतु या घटनेला आज 120 वर्षे पूर्ण झाली आहेत तरी सुद्धा हे थोर नेते अजून या देश्याच्या जनतेच्या मनात घर करून बसल्याचे आपणास दिसते.

 आज बिरसा मुंडा यांच्या इतिहासाबद्दल जास्त न बोलता त्यांच्या विचारांवर या परिस्थितीत कसे काम करायला पाहिजे या विषयावर थोडेफार लिहणार आहे. कदाचित माझे हे बोलणे व लिहणे समजातील काही घटकांना पटणार नाही. व ज्यांना पटणार नाही त्यांची मी आत्ताच माफी मागतो. कारण आज जर आपण बघितले तर असे जाणवते की आमच्या समाज्याचे देश्याचे हे क्रांतिकारक आपल्या समाज्याच्या न्याय मिळावा यासाठी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता दिवसरात्र जुलमी सत्तेच्या विरोधात लढत राहिले. बिरसा मुंडा हे मुळात आदिवासी जमातीतील खूप मोठे क्रांतिकारी होते यात शंका नाही. परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण जर पाहिले तर आपल्याला हे पाहण्यास मिळते की या देशाच्या थोर क्रांतिकारकांच्या यादीत सुध्दा त्यांना खूप मोठे स्थान आहे.

इंग्रजांनी या देशात सत्ता स्थापन करण्यासाठी फोडा व राज्य करा ही नीती अवलंबली होती. आणि ही रणनीती बिरसा मुंडा यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी जे धर्माच्या नवे फोडा फोड चालू होती ती थांबवण्यासाठी आदिवासींचे ख्रिस्ती धर्मात सक्तीने होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी जागृत मोहीम हाती घेऊन धर्म परिवर्तनास प्रखर विरोध केला. तसेच आपल्या समजतील लोकांना एकत्र करून समाज्यावरील आन्यायास वाचा फोडली.

परंतु आज आपण बिरसा मुंडाचे वारसदार स्वतःला म्हणवून घेत असताना आपण आपल्या समाजात किती एकजूट निर्माण करत आहोत. की त्यांच्यामध्ये जर फोडाफोड करत असेल तर आपल्याला त्यांचे वारसदार म्हणणे शोभते का या गोष्टीचा विचार पण आपण करायला पाहिजे. आपल्या समजावर एखादे संकट आले किंवा अन्याय झाला तर आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याला विरोध करणे हे बिरसा यांचे स्वप्न होते. व हाच त्यांचा वैचारिक मार्ग होता पण सध्या आपण तो मार्ग अवलंबत आहोत का? की एकमेकांना समजून न घेता. एकमेकांना नावे ठेवण्यात व्यस्त आहोत. मला माहित आहे आज समाज्याच्या वेगळ्या वेगळ्या नावाच्या अनेक संघटना आहेत व प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असणे स्वाभाविक आहे. परंतु प्रत्येकासमोर समस्या सारख्याच आहेत यात काही शंका नाही. त्यामुळे आपल्याला वेळ प्रसंगी एकमेकांच्या सोबत तर कधी कधी एकमेकां पासून दूर राहून काम करत आले पाहिजे. म्हणूनच या गोष्टीकडे येत्या काळात लक्ष्य देऊन काम करणे गरजेचे आहे. तरच बिरसा मुंडा यांनी आपल्याला जी एकत्र येऊन काम करण्याची दिशा दाखवली होती त्या मार्गानं जात आहोत असे म्हणायला काही हरकत नाही.

समाजाच्या मूलभूत गरजांवर जर आक्रमण होत असेल तर त्यावर आक्रमक होऊन लढा उभारणे गरजेचे आहे हे बिरसा मुंडा यांनी आपल्या कार्यातून दाखवले आहे. उधारणाद्वारे सांगायचे झाले तर आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन  तसेच सावकार यांची मनमानी व अति कर प्रणाली यावर इंग्रज सरकारने मनमानी कारभार करत होते. त्यामुळे आदिवासी समाज बेघर होत होता. त्यामुळे त्यांच्या या परिस्थितीला कारणीभूत असलेले जे कोणी सरकार आहे त्याला सळो की पळो करणाऱ्या मध्ये बिरसा मुंडा हे अग्रस्थानी असल्याचे आपणास पाहण्यास मिळते. परंतु आज आपण जर बघितले तर या देशातील जनतेला आपल्या मूलभूत सुविधा सुद्धा भेटत नाहीत त्यावर बोलण्यास कुणीही धास्तावत नाही. बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण जेथे जेथे आन्याय होईल तेथे तेथे प्रखरपणे उभे राहणे गरजेचे आहे. व शोषितांना न्याय मिळवून देणे ही सुद्धा बिरसांची शिकवणूक अंगिकारने गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे हे की आपण आजच्या काळात बिरसा यांच्या विचारांना आपल्या कार्याची जोड दिली तर मी म्हणतो या देशयातील दलित,आदिवासी व इतर मागास समाज यातील कुणीही आपल्या आधिकारांपासून वंचित राहणार नाही. 

आपण या थोर क्रांतिकारकास एखाद्या समाजापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे हे महान जगाला कसे कळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व त्यांचा प्रेरणादायी इतिहास जगाला ओरडून सांगितला पाहिजे. आणि हे सर्व करण्यासाठी आपल्या रक्तात जो बिरसा आहे तो या वास्तव परिस्थितीशी झुंजला पाहिजे.

विकास भाईक, खेड 

संबंधित लेख

लोकप्रिय