समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माध्यमे काम करीत आहेत हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत. प्रिंट मिडिया असेल इलेक्ट्रॉनिक मिडीया असेल यांचे महत्व आजच्या सोशल मिडीयाच्या जगात कमी झाले नाही हे आपण पाहतो आहोत परंतू या मिडीयाची विश्वार्हता संपली आहे हे आता नक्की झाले आहे.
प्रिंट व इलेक्ट्रॉनिक हे दोन्ही माध्यमे भांडवली विचारधारा, शोषणाची चक्रे तिव्र होण्यासाठी काम करीत आहेत हे सध्या स्पष्ट दिसते आहे. याला काही एनडीटिव्ही सारखे अपवाद आहेत. मोदींना सत्तेवर बसवण्यात या माध्यामांचा जबदरस्त उपयोग केलेला संपूर्ण देशाने पाहिला आहे. मोदी सत्तेवर बसल्या नंतरही सर्व बातम्या भांडवलीशाही पुरक, धर्माची अफु पाजण्यात, हुकूमशाही प्रवृत्तीची जोपासणा करणार्या, धार्मिक राष्ट्र वादाचा अजेंडा पुढे घेवून जाणार्या व डाव्या, पुरोगाम्यांची टिंगल मस्करी करण्याच्या हेतूने बनवल्या जातात व जनतेपर्यंत पोहोचतील याची खास अशी काळजी घेतली जाते आहे. कम्युनिस्टांना फील्टर करूनच त्यापुढे जात असतात व आहेत.
शेतकरी, शेतमजूर, दलित-आदिवासी, महिला शोषितांच्या प्रश्नांना बाजूला सारून, सरकारच्या घोषणांचा बागूलबूवा, जाहिरांतीचा गोंधळ, निमहकीम अँकरच्या हातात असणारी लोकशाहीची चर्चा आपन पाहत आलो आहोत. शेतकरी आत्महत्या आता वाचकांच्या ही पचनी पडलेली बातमी असल्याने ती संपादकीय पानाच्या नंतरच्या दोन तिन पानानंतर छोट्या मथळ्याने छापली जात आहे. संवेदना संपण्यासाठी हे मिडीया ऐवढेतर भांडवलदारांच्या, जमीनदारांच्याच व सत्तेच्या रक्षणासाठी करणार यात वाद नाहीच. भांडवली-जमीनदारी सत्ता हा सर्व मिडीया चालवत असल्याने हे होणारच आहे.
इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या चर्चेला आलेल्या धर्मनिरपेक्षतावादाची, श्रमिकांची बाजू न घेणार्या बुध्दीजींवीना बौध्दीक हमाली करणारे अँकर काही बोलू देत नाहीत. चर्चेला वेगवेगळी अंगे असतात, त्या सर्व अंगाने चर्चा व्हावी व त्यातील सूवर्णमध्य लक्षात घ्यावा असे आता होताना दिसत नाही. बहुसंख्य ठिकाणी तर सत्ते पासून दुर असणारे म्हूणून त्या वर आपला कडवा संघर्ष मांडून लोकशाहीला मजबूत करण्यासाठी लढणार्या डाव्यास बुध्दीजीवी, कार्यकत्यांना चर्चेत बोलवायचेच नाही असे धोरण राबवत असलेले इलेक्टॉनिक मिडीया आपन सध्या पाहत आहोत. यामागे असणारे भांडवली जाहिरातींचे अरबो रूपयांचे अर्थकारण व त्यामागील राजकारण कारणीभूत आहे त्या वर स्वतंत्र चर्चा करावी लागेल, असो.
मोदींंच्या निवडणूक काळात व त्या आगोदर वरील दोन्ही मिडीया सोबत, सोशल मिडीयाचा प्रचार यंत्रणेसाठी खुबीनी वापर करून त्यांना सामान्यांच्या गळी उतरण्यावत आले होते. गरीबी, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार यांना पुढे करत हिटलर याच पध्दतीने जाहिरीतींचा वापर करत सत्तारूढ झाला होता. तशाच काही पध्दतीने निवडणूका जिंकण्याची पध्दती, यंत्रणा व त्यावर असणारा अंमल तीव्र करून मोदी सत्तेच्या दिशेने गेले. मोदींना सत्तेवर बसण्यासाठी कासावीस झालेली आरएसएसने त्यांच्या केडरने विकत घेतलेले भाडेतत्वावर यांच्या मदतीने सर्व सोशल मिडीया काबीज केला होता. आजही कडवट उजव्या विचारांची मंडळी या माध्यमांवर छुप्या पध्दतीने काम करीत असलेले दिसतात. दडलेली हि पिलावळ योग्य वेळी बाहेर पडते व त्यांना दिलेले काम करून परत बिळात जावून दडून बसते.
सोशल मिडीयाचा वापर त्याचे महत्व लक्षात आल्यानंतर सर्वसामान्यांना त्याचा वापर वाढवला. हा वाढता वापर व सोशल मिडीयाचे सर्वसामान्यकरण व एज्युकेशन झाल्यानंतर मात्र सध्याच मोंदीचा जय जयकार करणारे धर्मवादाचे ढोलके वाजणारे टोळके बाजूला पडलेले दिसले. सोशल मिडीयाचे महत्व लक्षात घेत काही चळवळींचा वापर या सोशल मिडीयावर वाढलेला दिसतो आहे. लोकांपुढे प्रत्यक्ष जावून प्रबोधन करण्यावर भर असणार्या, प्रत्यक्ष भेटीला महत्व देणार्या विचारधारा देखील या मीडियाचा चांगला वापर करीत आहेत. जवळ जवळ सर्वच राजकीय पक्ष आता सोशल मिडीयावर काम करीत आहेत. परंतु लोकांमध्ये जाण्याला पर्याय होवू शकत नाही हेच खरे. मला (लेखकाला) साधना मध्ये नितीन वागळे यांचे भाषण छापून आले होते, त्यात ते साधारण असे म्हणतात की, डाव्या विचारांच्या चळवळींनी प्रसिध्दी पासून का म्हंणून दूर रहावे, त्या जर जनतेचे काम करीत असतील तर त्यांनी स्वतःला प्रसिध्दी दिलीच पाहिजे असा साधारण तो सुर होता. म्हणून श्रमिक, वंचितांच्या चळवळींनी देखील या माध्यमांचा वापर करीत जोर धरला आहे तर ते चांगलेच आहे.
सध्या सोशल मिडीयावर असणार्या भाजपाच्या प्रभावाची चर्चा समोर आली आहे. फेसबुक या समाज माध्यमावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप केंद्रात सत्तेवर असणारा पक्ष आहे. केंद्रातील सत्त्ता शक्तींचा वापर करून राज्या राज्यातील राजकारण ते आपल्या बाजून वळवण्यात निष्णांत झाले आहेत. लोकशाहीच्या वेगवेगळ्या संस्थांचा वापर दबाब तंत्रासाठी करणे हे त्यांच्या रण नीतीचा भाग बनून गेला आहे. तसाच दबाव सोशल मिडीया सारख्या कंपन्यांवर करून समाजात आरएसएसचा अजेंडा भाजपाने घेवून जाणे हा त्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे.
वॉल स्ट्रीट जर्नल च्या एका रिपोर्ट नुसार भारतातील फेसबुकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भाजपाचा एक नेता आणि हिंदु राष्ट्रवादाच्या लोकांच्या समूहाला समाजात तेढ पसरवणाऱ्या पोस्टवर फेसबुकच्या व्देषपूर्ण भाषणाचे नियम लावण्याला विरोध केला. ह्या लोकांपासून व समूहापासून फेसबुक वरील पोस्टच्या मायन्यातला म्हणजेच कंटेट ला अतिरंजित करून ‘पूर्ण पूणे हिंसेला प्रवृत्तन करणारा’ मानले गेले असे असताना देखील त्यांना त्यातून वाचवले गेले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल च्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, भारतातील फेसबुकच्या दक्षिण आणि मध्य आशिया प्रभारचे पॉलिसी निदेशक आंखी दास यांनी भाजपा नेता टी. राजा सिंह च्या विरूध्द फेसबुक च्या व्देषपूर्ण भाषणांच्या नियमांना लागू केक्यू विरोध केला होता कारण त्यांना भिती होती की, यामूळे कंपनी आणि भाजपा मधील संबंध बिघडतील.
त्याच प्रमाणे सत्तेचा वापर करून सोशल मिडीया सारख्यास कंपन्याावर दबाव आणणे हे अत्यंत सोपे काम भाजपा करण्यापासून कशी दुर राहू शकते. टि. राजा सिंह हे तेलंगामधील भाजपाचे एकमेव आमदार आहेत. त्या एकमेव आमदाराचे राजकारण पुढे घेवून जाण्यासाठी भाजपा काही करू शकते हे स्पष्ट आहे. टि. राजा सिंह हे सामाजिक तेढ निर्माण करणारी भडकावू वक्तव्य भाषणबाजी करण्यात गाजलेले नाव आहे.
अमेरिकेतील वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार फेसबुकच्या काही माजी तर काही कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सु्त्रांनुसार म्हणले आहे की, फेसबुकचे वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी आपल्या स्टाफला सांगितले होते की, मोदींच्या नेत्यांच्या व्दारे नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंडित केल्यास भारतामध्ये कंपनीच्या व्यापाराला नुकसान पोहचू शकते.
रिपोर्ट पुढे म्हणतो, ‘दास, यांच्या कामात फेसबुक आणि भारत सरकार यांच्या मध्येय लॉबींग आहे. लॉबिंग या शब्दांचा अर्थ काय हे आपल्याला माहित पाहिजे, साखर लॉबी, बिल्डर लॉबी असे आपन म्हणतो, म्हणजे ते एक संघटनाच होय. परंतू सरकार दबारी दबदबा तयार व्हावा, सरकार सोबतच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी जे काम केले जाते ते काम लॉबी काम करते. काही फायदा करवून घ्यायचा असल्यास सरकारची मेहरबानी असावी लागते अशा लॉबीचा मुखीया हा सरकारशी किंवा सरकारच्या कर्त्या प्रतिनीधींना गाठून आर्थिक किंवा इतर मेहरबानी साठी प्रयत्न करतो त्यास लॉबिंग म्हणले जाते. अशी लॉबिंग फेसबुक आणि भारत सरकार यांच्या मध्ये लॉबींग आहे असे रिपोर्ट म्हणत असेल तर हे अत्यंत घातक आहे.
रिपोर्ट पुढे म्हणतो, ‘फेसबुकच्या कामावर माजी व आजी कर्मचाऱ्यांनी म्हणले आहे, आमदार टि. राजा सिंह यांच्या बाजूने आंखी दास यांनी हस्तक्षेप केले जाणे हे मोदींची पार्टी भाजपा आणि हिंदू राष्ट्रवाद्यां प्रति फेसबुकद्वारे पक्षपात केले जाण्याचा व्यापक पैटर्नचा हिस्सा आहे. हा पैटर्न किती व्यापक असू शकतो याची कल्पना आपन करू शकतो. देशात घडणाऱ्या विविध हुकूमशाही घटना, लेखकांवर मारलेला अर्बन नक्षलवादावा शिक्का हे या पैटर्नसाठीच घडवून आणले जात आहे असे दिसते आहे.
आरएसएसला हिंदुत्व वादाचा अजेंडा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी ती भाजपा या राजकीय पक्षाचा वापर करी आहे. देशाला कट्टर धार्मिक अजेंड्याकडे नेले की, भांडवली अर्थकारणाला राण मोकळे होते श्रमिक, शोषित, वंचितांचे प्रश्न बाजूला पडतात. हा आरएसएसच्या षडयंत्राचा भाग आहे.
टि. राजा सिंह यांना खतरनाक व्यक्ती म्हंणून चिन्हाकिंत केल्यास सरकार सोबतचे राजकीय हितसंबंध बिघडू शकतात असे हि म्हणून दास हे सिंह यांच्ये बाजून उभे राहिले होते. ‘लव्ह जिहाद’, ‘मुस्लिमांनी मुद्दामहून कोरोना पसरविला’, या भाजपच्या लोकांकडून टाकल्या जाणाऱ्या पोस्ट विरुद्धही दास यांच्या फेसबुक टीमने कोणतीही कारवाई केली नाही, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये म्हणले आहे.
म्हणजेच कोरोना काळात मुस्लिमांना टारगेट करण्यात फेसबुकचा सहभाग आहे हे स्पष्ट होते आहे. भारतात कोरोना पसरण्यासाठी सरकारी धोरणे कारणीभूत आहेत, ज्या वेळी कोरोना भारतात आला होता त्यावेळी पंतप्रधान हे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना मिठी मारण्यात व्यस्त होते. त्यांचे पुढे तिव्र परिणाम गरिब जनतेला भोगावे लागले, वंदे मातरम मिशन सारखे मिशन राबवून परदेशात असणाऱ्या भारतीयांना आणले गेले परंतू गरिब जनतेला रस्त्यावर, रेल्व रूळांवर मरू दिलेले आपन पाहिले आहे म्हणजेच भाजपाचा कोविड काळात गरिबांच्या विरोधात, मुस्लीमांच्या विरोधात अजेंडा राहिला आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
भाजपला निवडणुकीच्या संदर्भात दास यांनी फायदेशीर, मदतीच्या बाबी केल्या होत्या, असे फेसबुकच्या माजी कर्मचारी सांगतात, रिपोर्ट मध्ये म्हणले आहे, “गेल्या वर्षी भारतामध्ये लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू होण्यापूर्वी एप्रिलमध्ये, पाकिस्तानी सेना आणि कॉग्रेसशी संबंधीत फेक पेजेस हटविण्यात आल्याचे फेसबुकने जाहीर केले होते. मात्र भाजपशी संबंधीत खोट्या बातम्या पसरविणारी पेजेसही काढून टाकण्यात आल्याचे दास यांच्यामुळे जाहीर करण्यात आले नाही,”
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ च्या बातमीदारांनी लक्षात आणून देई पर्यंत, मुस्लिम विरोधी आणि व्देष, घृणा पसरविणाऱ्या भाजप खासदार अनंत कुमार हेगडे आणि सिंह यांच्या पोस्ट फेसबुकने डिलिट केल्या नव्हत्या,’ असेही रिपोर्ट सांगतो. म्हणजे अमेरिकन बातमीदारांनी याबाबत प्रश्नु विचारायला चालू केल्यानंतर कार्यवाही केली गेली.
वरील परस्थितीवरून असे वाटते की, गुजरातेत मुस्लीमांच्यात कत्तंली, सीएए, एनआरसी नंतरचा दिल्लीच दंगा व भिमा कोरेगांव यामागे भाजपा का असू शकणार नाही. उलटपक्षी जे लोकशाहीची, शोषितांची, अल्पसंख्यांची बाजू घेवून बाजू मांडणारे विचारवंत, बुध्दीजीवी होते, हुशार रिसर्च स्कॉरलर विद्यार्थी यांना जेरबंद केले आहे. हि मजल येथपर्यंत गेली कि, विरोध दर्शवणाऱ्या गर्भवती महिलांना देखील सोडले गेले नाही. वरील रिपोर्टच्या माहितीवरून भाजपा कोणत्या स्थरला जावू शकते व देशात कशा प्रकारे विषारी बिजपेरणी करू शकते हेच लक्षात येते.
हा सर्व गोंधळ होत आहे, असे लक्षात आल्यावर, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ने प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर टी राजा सिंह यांच्या काही पोस्ट फेसबुकने डिलिट केल्या. हे सर्व उशीराने केले गेले आहे. कोरोना, जिहाद या खासदार हेगडे यांच्या पोस्ट‘वर देखील सर्व चर्चा झाल्यानंतरच उशीराने कार्यवाही केली.
यावरून फेसबुकचे भगवेकरण करण्याचा भाजपाने विडा उचल्यायचे दिसते आहे, भारत-चिन सिमा तणावाच्या पार्श्वदभूमीवर केंद्र सरकारने काही ॲप बंद केले होते परंतू त्यातील कित्येक ॲप कंपन्याकडून भाजपाने पैसे लाटले होते हे आता लपून राहिलेले नाही. यामागे आरएसएसची भाजपा जे काही केले असेल हे कॉमन सेंस असणाऱ्या कोणत्याही सुज्ञ नागरिकास लक्षात येवू शकते.
सत्तेच्या पायताना खाली गेलेल्या फेसबुकवरील आपल्या पोस्ट कशा मागे पडतात, त्यांचे कसे रिपोर्ट मारले जातात, आपल्या आवडी निवडी यावर कसे लक्ष ठेवले जाते, आपण कोणाला लाईक करतो, आपणाला कोन कोन लाईक करतात, आपण काय व्यक्त होतो, कोनाचा वॉल पाहतो, काय वाचतो यावर सरकारचे पूर्ण लक्ष आहे, त्यामुळे या माध्यामांचा विशिष्ट पध्दतीने वापर करणे सोईस्कर राहिल असे वाटते.
– प्रविण मस्तुद
– बार्शी (सोलापूर)
– pravinmastud310@Gmail.Com
(लेखक हे पी.एच.डी. चे संशोधक विद्यार्थी आहेत)