Thursday, April 25, 2024
Homeराज्यकोविडमुळे निराधार झालेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च राज्य सरकार उचलणार, मोबाईल, लॅपटॉप आदी...

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च राज्य सरकार उचलणार, मोबाईल, लॅपटॉप आदी शैक्षणिक साधनेही पुरवणार

मुंबई : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन हाती घेत आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई तसेच इंडियन सायकियाट्रिक सोसायटी या संस्थांसोबत दोन सामंजस्य करार करण्यात आले.

कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्यशासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षण आदी सुविधा उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. अशातच या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत ही बाब प्रशंसनीय आहे, असे उद्गार यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी काढले.

राज्यात आतापर्यंत दोन्ही पालक गमावलेली ४०० हून अधिक आणि एक पालक गमावलेल्या तेरा हजाराहून अधिक बालकांची माहिती सरकारला मिळाली आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती जमा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्यात आले आहे. त्यानुसार माहिती प्राप्त झालेल्या बालकांच्या खात्यावर राज्य शासनामार्फत ५ लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात ठेवणार आहे. ही रक्कम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असून मुलाचे वय १८ वर्षे झाल्यानंतर व्याजासह त्याला दिला जाणार आहे. तोपर्यंत दैनंदिन खर्चाच्या अनुषंगाने बालसंगोपन योजनेचा लाभ या बालकांना देण्यात येणार आहे. तसेच या बालकांची मालमत्ता आणि इतर कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील टास्क फोर्सच्या माध्यमातून पार पाडली जाईल, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

ॲड. ठाकूर यांनी पुढे सांगितले, राज्यशासन या बालकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. तथापि, स्वयंसेवी संस्थांनीही या कामात पुढाकार घेतल्यास बालकांचे पुनर्वसन गतीने होऊ शकेल. त्यादृष्टीने प्रोजेक्ट मुंबई या एनजीओने दोन पालक गमावलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क भरण्याची जबाबदारी स्वीकारुन पुढाकार घेतल्याबद्दल मंत्री ॲड. ठाकूर यांनी संस्थेचे कौतुक केले. तसेच बालकांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन सेवा आदी पुढाकारासाठी इंडियन सायकियाट्रिक सोसायटीबद्दलही गौरवोद्गार काढले.

शिषीर जोशी म्हणाले, प्रोजेक्ट मुंबई संस्थेद्वारे कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या राज्यातील बालकांचे पुढील तीन वर्षाचे शैक्षणिक शुल्क बालकांच्या नावे थेट शैक्षणिक संस्थेत जमा करण्यात येईल. शिक्षणासाठी आवश्यकतेप्रमाणे ॲण्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप, सायकल आदी बाबी पुरवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत पुरवण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात एक पालक गमावलेल्या बालकांनाही मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संस्थेने 1800 102 4040 हा समर्पित टोल फ्री क्रमांक सुरू केला असून संकटग्रस्त बालकांनी मदतीसाठी यावर संपर्क साधल्यास त्यांना तातडीने मदत पुरवण्यात येणार आहे, असेही जोशी यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय