इंदूर : राम नवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतानाच त्याला गालबोट लागलं आहे. एक भयंकर घटना घडली. पूजेसाठी आलेल्या भाविकांवर काळाने घात केला. कन्यापूजा सुरू असताना विहीर कोसळली.ही विहीर मंदिर परिसरातील आहे. तिथे पूजेसाठी भाविक आले असताना ही दुर्घटना घडली. या विहिरीत 50 जण बुडल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे. तर स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 24 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग, पोलीस जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 15 हून अधिक मृतदेह हाती लागले. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदौर इथे पटेल नगर परिसरात श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात घडली आहे. या मंदिरात राम नवमीनिमित्तानं होम आणि कन्या पूजेचं आयोजन करण्या आलं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक काय झाले ते कोणालाच समजलं नाही. तरीही स्थानिक लोकांनी पुढे येऊन मदत करायला सुरुवात केली. त्यांनी 10 जणांना बाहेर काढलं. जखमींना ऍपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. मंदिराबाहेरील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही विहीर बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहे, याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती. या विहिरीसाठी प्रशासनाकडून नोटीसही आल्याची माहिती मिळाली आहे.
धक्कादायक! मंदिरात पूजा सुरू असताना कोसळलं छत, इतक्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
संबंधित लेख