नाशिक : नुकतीच देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. त्यावेळी मंदिरात पुजा करण्यात आली. मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याच्या संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने खळबळ उडाली आहे.
संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप केला आहे. तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे.
काय आहे पोस्टमध्ये ?
हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्या, परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्यांना सद्बुद्धि दे. हीच आमची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण सर्वजण देवाची लेकरे आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.
त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली ! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.
या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही ? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे. अजून खूप चालावे लागणार आहे.
हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे.