Wednesday, April 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस. एम .जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन

एस. एम .जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन

हडपसर / डॉ. अतुल चौरे : प्रत्येकाला आपली मातृभाषा उत्तम यायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थाने वाचन लेखन केले पाहिजे. पुस्तक वाचनाने प्रगल्भ व्हा. प्रत्येकाचे स्वतःचे ग्रंथालय असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी चरित्रे वाचून आपले चारित्र्य घडवावे. डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रतिकूलतेतून घडले. मराठी माणूस ज्ञानाच्या, वाचनाच्या बळावर मोठा होऊ शकतो. हे माशेलकरांनी दाखवून दिले. ज्ञान ही एक मोठी शक्ती आहे. अभ्यासातूनच मोठे व्हा. चरित्र वाचल्यावर चारित्र्य घडते. असे प्रतिपादन जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी केले.

ते मराठी भाषा गौरव दिन समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या “चरित्र, आत्मचरित्र व आत्मकथन विशेष संदर्भ- दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर” या विषयावरील परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर जाधव म्हणाले की, चरित्रकार हा जाणकार असतो. चरित्र लिहिणारा चरित्रकार विशिष्ट उंचीचा असला तरच तो सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच रघुनाथ माशेलकर हे समाजाचे नायक आहेत. समाजाला दिशा दाखवणारे दिशादर्शक आहेत. म्हणून अशा थोर पुरुषांची चरित्रे आजच्या विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. असे प्रतिपादन डॉ. मनोहर जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांनी मराठीतील सुंदर कलाकृतींचा आस्वाद घेतला पाहिजे. स्मृतिचित्रे, श्यामची आई, कऱ्हेचे पाणी या कलाकृतींची निर्मिती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. हळदीचे आणि बासमतीचे पेटंट जिंकणारे रघुनाथ माशेलकर श्रेष्ठ आहेत. असे विचार त्यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम यांनी केले. तर आभार प्रा. धीरेंद्र गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संदीप वाकडे, प्रा.पूनम तडके, प्रा. शुभम तांगडे, प्रा. तृप्ती हंबीर, प्रा. गणेश जाधव यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संजय जडे, सर्व प्राध्यापक विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय