Sunday, March 16, 2025

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर, वाचा अविनाश पाटील यांचे संपुर्ण पत्र !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

सस्नेह नमस्कार, 

आदरणीय भाई एन डी पाटील सर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतरच्या दुःखातून आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघटना अजून सावरत असताना आमच्या संघटनेने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या जागेवर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्न येत नाही, असा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी. येत्या जून २०२२ मध्ये विद्यमान राज्य कार्यकारिणीचा कालावधी संपत असून त्यानंतर संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. माननीय सरोजताई पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने केली आहे. या निवडीबद्दल सरोजताईं पाटील यांचे मी अभिनंदन करतो आहे.  मात्र या गटाचा डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही सदर गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत, पण ते ४/६ महिन्यातून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समिती विरोधात समांतर कार्यपद्धती अवलंबत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच माननीय सरोजताई पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षा म्हणून सदर गटाने निवड जाहीर करणे आहे. समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे.

वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले- शाहु- आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या ६० वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट १९८९ रोजी झाली. १९८९ ते २००९ पर्यंत डॉ नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना २०१० साली अविनाश पाटील यांची, म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून‌ सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग जवळपास एक तप, १२ वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे. १९८९ पासून ते‌ मृत्यु पर्यंतच्या १७ जानेवारी २०२२ पर्यंत आदरणीय भाई एन डी पाटील सर हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष होते. एका बाजूला डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाची वेदना मनात असताना, दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते उमेदीने काम करत होते. खुनानंतरच्या आठ वर्षात लोकशाही, विकेंद्रित कार्य पद्धती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे समितीचे काम दुप्पट वाढले, व्यापक अंगाने विस्तारले‌ आहे. अंधश्रद्धा निर्मूलन‌ एके‌ अंधश्रद्धा निर्मूलन‌ या मर्यादेत न राहता समाजातील व्यापक परिवर्तनाशी जोडुन घेण्याचा प्रयत्न आम्ही यथाशक्ती केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाची‌ दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास ३० वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ नावाचे नवे मुखपत्र सुरू केले असून आतापर्यंत त्याचे ५ हजारांहून अधिक वाचक सभासद झालेले आहेत. महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहिद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैलाताई दाभोलकर यांच्याकडे‌ सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत २५ वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण ७ कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे. 

महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष ही सन्मानाची पदे असून कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, सरचिटणीस, विविध सतरा विभागांचे कार्यवाह, सहकार्यवाह ही कार्यकारी आणि दैनंदिन कामाची जबाबदारी असलेली पदे आहेत. महाराष्ट्र अंनिस संघटनेची राज्य कार्यकारणी दर तीन वर्षांनी निवडली जाते. सध्याची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी राज्य पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारणी भोर, जिल्हा पुणे येथे जून २०१९ मध्ये निवडली गेली होती. सदर राज्य कार्यकारणी निवड भाई एन डी पाटील सरांच्या मार्गदर्शनात केलेली आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या एन डी पाटील सर यांची याही वेळी पुन्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती. माझीही राज्य कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. सोबतच डॉ प्रदीप पाटकर (पनवेल), उत्तम कांबळे (नाशिक), महादेवराव भुईभार (अकोला), श्यामराव अण्णा पाटील (इस्लामपूर), डॉ सुरेश खुरसाळे (अंबेजोगाई) यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. त्याच वेळी माधव बावगे (लातूर), सुशीला मुंडे (नवी मुंबई), संजय बनसोडे (इस्लामपूर), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई) हे राज्य प्रधान सचिव निवडले गेले होते. नितीन राऊत (अलीबाग), सुरेखा भापकर (डोबिंवली), शहाजी भोसले (औरंगाबाद), हरिदास तम्मेवार (लातूर), विनायक सावळे (शहादा), डॉ ठकसेन गोराणे (नाशिक), संजय शेंडे (नागपूर), बबन कानकिरड (अकोला), सुधाकर काशीद (मोहोळ), कृष्णात कोरे (कोल्हापूर) हे राज्य सरचिटणीस म्हणून निवडले गेले होते. तसेच राज्यस्तरीय १७ विविध विभागांचे ५२ राज्य कार्यवाह व राज्य सहकार्यवाह हे निवडले होते. निवडलेल्या एकूण ७५ पदाधिकऱ्यांपैकी ५६ जण आजही पदावर कार्यरत आहेत. राज्य कार्यकारणी प्रमाणेच ३६ जिल्ह्यांच्या जिल्हाशाखांची रचना आहे. या ३६ जिल्ह्यातील ३५० पेक्षा अधिक शाखांच्या कार्यकारणीची रचनाही राज्य- जिल्हा कार्यकारणी प्रमाणे आहे. ५६ राज्य पदाधिकारी, १०८ जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि १०५० हुन अधिक शाखा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आहेत. राज्यापासून ते शाखांपर्यंत सुमारे तेराशे मुख्य पदाधिकाऱ्यांची टीम संघटनेसोबत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातील सक्रिय कार्यकर्तेमधील ९० टक्के कार्यकर्ते संघटनेसोबत आहेत. महाराष्ट्रातील अशा सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या सुमारे १० हजारपेक्षा अधिक निश्चित आहे. भाई एन डी पाटील सर संस्थापक अध्यक्ष असलेली, शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि मी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत‌ राहीलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना सक्रीय आहे. 

तसे तर‌ अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाचे श्रेय हेच एकमेव असते. त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. असे संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे ‘श्रेयस’ कोणत्याही प्रकारे हिरावले जाऊ शकत नाही या आशावादासह जिंदाबाद ! 

विवेकाचा आवाज बुलंद करु या ! ! 

लढेंगे, जितेंगे ! ! ! 

– अविनाश पाटील

(महा अंनिसचा विवेक जागर)

Related Articles

- Advertisement -

Latest Articles