जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी संविधान बदलाला विरोध केला असून तसा कुणी प्रयत्न केला तर आमच्यासारखा वाईट कोणीच नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर गुरुवारी जळगावात झाले. त्यावेळी रामदास आठवले जळगावात बोलत होते. त्यांनी मार्गदर्शन करताना विविध विषयांवर संवाद साधला.
आठवले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला अजून कोणी हात लावलेला नाही, तसा प्रयत्न झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. नाशिक जेलमध्ये मी १५ दिवस राहिलो आहे. आताही जेलमध्ये जाण्याची तयारी आहे, असेही आठवले म्हणाले.
आठवले यांनी इंडिया आघाडीवर देखील टिका केली. नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा दावा करत इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा असेही ते म्हणाले.
दरम्यान, इंडिया आघाडीत २६ पक्ष एकत्र आले आहेत त्यात अजून १६ ते १७ पक्ष समावेश होणार असल्याची माहिती आहे.