हिंजवडी : पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीतील एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहेत.
आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायजर बनवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतमध्ये अडकलेल्या मध्ये काही महिला कामगारांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. या आगीमध्ये कंपनीतील ३७ पैकी १७ कामगार बेपत्ता असून १५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुपारी ३ वा अल्कोहोलमुळे ही आग लागली, त्यावेळी प्रचंड काळेभोर धुराचे लोट पसरले, दोन मजली इमारतीमध्ये दोन पुरुष आणि 15 महिला अडकल्या होत्या त्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्यू झाला. जेसीबीने कारखान्याची भिंत तोडली. हा ग्रामीण भाग असल्याने येथे विझवण्यास वेळ लागला त्यासाठी हिंजवडी पुणे येथून अग्निशामक दलाचे बंब आले.
– दत्तात्रय साळुंके – स्थानिक ग्रामस्थ, उरवडे
दरम्यान, दुपारी अचानक आग लागल्या नंतर जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, ते अद्याप समजू शकलेले नाही.