पिंपरी चिंचवड, ता.९ : चिखली येथील घरकुल वसाहतीत सर्वत्र पावसाचे पाणी शिरले. आज (९ ऑक्टोबर) रोजी रात्री आठ वाजता पडलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील सर्व रस्त्यावर आणि इमारतींच्या तळमजल्यातील लिफ्ट मध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची दैना उडाली.
स्पाईन रस्त्याच्या कडेला असलेल्या संभाजी नगर, चिंचवड येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP- Sewage Treatment Plant) चे पाणीही ओसंडून वाहिल्यामुळे ते चिखली पेठ क्र.१७ आणि १९ येथील घरकुल वसाहतीत शिरले.
तुकाराम तनपुरे फाउंडेशनचे पदाधिकारी विजयकुमार आब्बड यांनी सांगितले की, भारत सरकारच्या या प्रसिद्ध घरकुल वसाहतीचे नियोजन करताना या सखल भागात पाणी शिरू शकते आणि अतिपावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊ शकते, याचे भान नवी नागरी वसाहत उभारताना पिंपरी चिंचवड मनपाच्या लक्षात आले नाही?
तुषार सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते) म्हणाले की, येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरेशा मिळत नाहीत त्यामुळे आधीच त्रस्त आहेत. सलग सात वर्षे हे तुंबणारे आणि एस टी पी प्लांट मधून येणारे प्रचंड पाणी मोठी पाईप लाईन करून जवळच्या इंद्रायणी नदीत प्रशासनाला वळवता येऊ शकते. त्यासाठी मनपाच्या पर्यावरण अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलेले नाही. एस टी पी प्लॅन्ट आणि पावसाचे पाणी नेवाळे वस्ती चिखली येथे जाते. तिथून पाणी इंद्रायणीत जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, दरवर्षी येथे पाणी साचून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. इथे गोरगरीब लोक आहेत. येथील चारही नगरसेवकांनी सुरवातीपासून येथील समस्येकडे लक्ष देऊन पाणी निचऱ्याची योजना कार्यान्वित करायला हवी होती. किमान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करावी.
सखल भागात असलेल्या या वसाहतीतील पोलीस मित्र संघटना आणि तुकाराम तनपुरे फाउंडेशनचे पदाधिकारी विजयकुमार आब्बड, कुणाल बडीगेर, बरगळी गावडे, चैतन्य चव्हाण, राम खापरे, कांतीलाल हरिणखेडे, अशोक कोटमाळे, तुषार सोनवणे, बापू ढेकळे यांनी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना सुरक्षित जाण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मदत करत होते.