पिंपरी चिंचवड, दि. २२ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘आंधळ दळतंय आणि कुत्रे पीठ खातय ‘असाच कारभार सुरू आहे. भर पावसात शहरातील विविध रस्त्यांवरील डांबरांची कामे होताना दिसत आहेत. भर पावसाळ्यात खोदाई सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांंना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत आहेत. रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारण्याची हिंमत टक्केवारीमुळे लाचार झालेल्या नगरसेवकांकडे नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी संतप्त टीका सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.
याबाबत भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्ते खोदाई, डांबरीकरण आदी कामे नियमानुसार 15 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र, पावसाळा सुरू होऊनही शहरातील विविध भागात भर पावसात रस्त्यांवरील डांबरांची कामे होताना दिसत आहेत. खोदाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची शारीरिक मानसिक, आर्थिक, मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सामान्य नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असुन ते धोक्यात आले आहे. पावसामुळे मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या अशा कारणांमुळे पाण्यात जाणारा पैसा हा आमच्या कष्टातून घाम गाळून तो वेगवेगळ्या करांच्या रुपाने आमचाच असतो आणि त्याचा विश्वस्त म्हणून नगरसेवक अशा प्रकारे विनियोग करतात.