बीड / अशोक शेरकर : बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे या मागणीचे निवेदन मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी (दि.२) राज्याचे कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना दिले असल्याची माहीती किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.
कॉम्रेड बुरांडे म्हणाले, बीड जिल्हयातील लाखो शेतकऱ्यांनी २०२० चा पिक विमा भरलेला आहे. अग्रीकल्चरल ईन्शुरन्स कंपनीसाठी जिल्हयातील सुमारे सात लाख शेतकऱ्यांनी सुमारे सातशे कोटी रूपयाचा विम्याच्या हप्त्यापोटी रक्कम भरलेली हेती. केवळ १९ हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रूपयाचा विमा कंपनीने मजुर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा मंजुर झाला आहे त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार पाठविली नाही या सबबीखाली विमा मंजुर केला नाही. बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळालेले आहे. शासनाचा नुकसानीचा अहवाल असतानाही विमा कंपनी विमा नाकारत आहे. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान करणारी आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा २०२० चा पिक विमा मंजुर करण्यास विमा कंपनीस भाग पाडावे या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयात सोमवारी (दि. २) कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांची किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, ऊसतोड मजूर युनियनचे कॉ. मोहन जाधव यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.
निवेदनात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न मिळाल्यास कोरोना काळात हजारो शेतकरी विमा कंपनीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतील असा इशारा देण्यात आला आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्याच्या बाजुने सहानुभुती पुर्वक विचार करू असे आश्वासन दिले आहे.