अवघ्या 22 तासात पूर्ण केली आळंदी ते तुळजापूर आरोग्य जनजागृती सायकल मोहिम !
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : ‘एक तास व्यायाम करुया आपलं ह्रदय नेहमी सुरक्षित ठेवूया.., या संकल्पनेतून गोल्डन सायकलिस्टचे आठ सायकल पटू आळंदी ते तुळजापूर पर्यंत प्रमुख विविध शहरमध्ये आरोग्य विषयी जनजागृती करत हडपसर, यवत, कुरकुंभ, इंदापूर, सोलापूर, तुळजापूर 320 कि.मी.चे अंतर आवघ्या 22 तासात यशस्वी पूर्ण केले.
दिघी येथील सायकलपटू दत्ता घुले यांनी सांगितले की, सायकल चालवणं हा सोपा आणि स्वस्तात मस्त असा पर्याय आहे. नोकरदार विद्यार्थी यांनी दैनंदिन जीवनात जवळच्या ठिकाणी सायकल वापरली तर आर्थिक बचत होते, तसेच आरोग्य उत्तम राहून परिसरातील पर्यावरण संतुलनासाठी अप्रत्यक्ष मदत होते. प्रगत देशामध्ये सायकल आजही प्रवासी वाहन म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ सायकल चालवलात तर तुमचे वजन नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी काही पर्याय जर तुम्ही निवडत असाल तर तुमच्या वर्कआउट प्लॅनमध्ये सायकलिंगचा नक्की समावेश करा,असे दत्ता घुले यांनी सांगितले.
यावेळी सायकल पटूंनी आईतुळजाभवानीची महाआरती करुन देवीचे दर्शन घेतले. या आरोग्य मोहिम जनजागृतीमध्ये सायकल पटू दत्ता घुले, मधूकर मोरे, वैभव पाटिल, विनायक तारवे, चिंतामणी मांडगुळकर, दिलीप यलपले, जितेंद्र मिश्रा सहभागी झाले होते.