काँग्रेस, शेतकरी संघटना, कामगार संघटना आणि समविचारी पक्ष व संघटनांनी केला आनंदोत्सव
पिंपरी, दि. १९ : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी प्रस्तावित तीनही काळे कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली, हे देशभरातील नागरिकांच्या एकजुटीचे यश आहे. आता कामगारांविरोधी केलेले प्रस्तावित चार कायदे रद्द करून आता देशभर जुन्याच कामगार कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी लढा उभारूयात असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
शुक्रवारी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाडू वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ओबीसी नेते प्रताप गुरव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, ज्येष्ठ कामगार नेत्या लता भिसे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश खंदारे, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, तसेच हिराचंद जाधव, आबा खराडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विशाल जाधव, के. हरी नारायनन, दिलीप पवार, किशोर ढोकले, निरज कडू, काशीनाथ नखाते, छाया देसले, विश्वास जगताप, झेवियर ॲथोंनी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील अकरा महिन्यांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी नऊ वाजता जाहिर केले की, तीनही प्रस्तावित शेतकरी कायदे मागे घेत आहोत. या महिन्यात होणा-या संसदीय अधिवेशनात याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात येतील. हे यश म्हणजे मागील अकरा महिन्यांपासून देशभर शेतकरी आणि कामगारांनी या कायद्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचे यश आहे. देशातील बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेससह इतर मित्र पक्षांनी आणि इंटकसह इतर कामगार संघटनांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन विविध प्रकारे आंदोलने केली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखिल कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीने पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला होता. अशाच प्रकारचे विविध आंदोलने शहरात करण्यात आली होती. यासाठी भाजपा शिवाय इतर सर्व पक्षांच्या खासदार, आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी आंदोलने करुन त्यात सहभाग घेतला होता या यशाविषयी या सर्वांचे अभिनंदन आणि आभार डॉ. कदम यांनी मानले.