Tuesday, January 21, 2025

प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या उपस्थितीत माथाडी कामगारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 

मुंबई, दि. ७ : काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे दिली.

टिळक भवन येथे आज अखिल भारतीय माथाडी, सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेचे नेते राजन म्हात्रे, अरुण रांजणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, बद्रुद्दीन जमा, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, कामगार, शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे, हे पंडित नेहरुंनी ओळखले होते. त्यांच्या ताकदीवरच स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम, बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले. कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. परंतु केंद्रातील भाजपा सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास पटोले यांनी यावेळी दिला. काँग्रेस प्रणित माथाडी कामगार संघटना सर्वात मोठी संघटना करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

माथाडी कामगार हा मुळात काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि याच पक्षाशी जोडलेला होता. परंतु, आधी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील यांनी भाजपचा मार्ग धरला. त्यानंतर बाबूराव रामिष्टे यांचे चिरंजीव अविनाश रामिष्टे यांनीही भाजपचा मार्ग धरला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे माथाडी कामगारांचे नेतृत्वच शिल्लक राहिले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर राजन म्हात्रे आणि अरुण रांजणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते अविनाश रामिष्टे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राजन म्हात्रे आणि अरुण रांजणे यांनी दोन वर्षांपूर्वी बाहेर पडून अखिल भारतीय माथाडी, सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन या नव्या संघटनेची स्थापना केली होती. 

अल्पावधीतच त्यांनी चांगला जम बसविला असून संघटनेची सभासद संख्या सात ते आठ हजार कामगारांवर गेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षालाही चांगले बळ मिळणार आहे. त्याचबरोबर राजन म्हात्रे आणि अरुण रांजणे यांनाही राजकीय संरक्षण आणि मदत मिळाल्यामुळे माथाडी चळवळीत अधिक जोमाने काम करण्याची संधी मिळणार आहे. काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था आणून देण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या नाना पटोले यांनी स्वतः या पक्षप्रवेश कार्यक्रमास पूर्णवेळ हजेरी लावून या घटनेचे महत्त्व अधोरेखित केले असल्याची माथाडी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles