मुंबई : धारावी परिसरात एका गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. (Dharavi gas cylinder blast) ही दुर्घटना सोमवारी रात्री धारावीतील एका व्यस्त रस्त्यावर घडली, जिथे ट्रकमध्ये लागलेल्या आगीमुळे 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आणि आगीचा भडका इतका मोठा होता की धुराचे लोट काही किलोमीटरपर्यंत दिसले. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. धारावीतील पीएमजीपी कॉलनीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून अचानक धूर निघू लागला आणि काही मिनिटांतच आग भडकली. आग इतक्या वेगाने पसरली की ट्रकमधील गॅस सिलेंडरमध्ये एकामागून एक स्फोट होऊ लागले. 10 ते 12 सिलेंडर फुटल्याने परिसरात स्फोटांचा मोठा आवाज घुमला, ज्यामुळे स्थानिक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. (हेही वाचा – प्रशांत कोरटकरला अटक, तेलंगणातून घेतले ताब्यात)
अग्निशमन दलाचे प्रयत्न | Dharavi gas cylinder blast
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्फोटांचा धोका लक्षात घेता, अग्निशमन दलाने परिसराला तात्काळ रिकामा करून आग विझवण्यास सुरुवात केली. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. (हेही वाचा – कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्याने राडा, शिवसैनिकांकडून स्टुडिओची तोडफोड)
पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ट्रकमधील सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी. ट्रकमध्ये एकूण किती सिलेंडर होते आणि त्यांची वाहतूक कायदेशीर होती की नाही, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी ट्रकमालक आणि संबंधित वाहतूक कंपनीच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी बोलावले आहे. (हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे)
या घटनेनंतर स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “धारावीकरांनी संयम राखावा. आग आटोक्यात आली आहे, पण ही घटना का घडली आणि सिलेंडरचा ट्रक तिथे कसा उभा होता याचा तपास व्हायला हवा.” (हेही वाचा – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती राहुल गांधींवर फिदा, बघायची लपुनछपुन फोटो)
दरम्यान, खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “धारावीमध्ये नो पार्किंग झोन असतानाही असे धोकादायक ट्रक नियमितपणे उभे केले जातात. हा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ आहे. महानगरपालिकेचे इतके मोठे बजट असूनही अशा घटना का घडतात?” (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)