Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअनंतराव पवार महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

अनंतराव पवार महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस. मराठी भाषेचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे, प्रचार-प्रसार व्हावा या विविध उद्देशाने हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने मराठी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. वैभवी काळे, प्रा. शहाजी शिंदे, डॉ. रेखा जोशी, डॉ. नागेश भंडारी, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, प्रा. दत्तात्रय फटांगडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी लेखन केलेल्या ‘सृजन’ भित्तीपत्रकाचे मान्यवरांचे शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी या सर्वांनी मराठी स्वाक्षरी करून मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचा निश्चय केला. ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, संदर्भ ग्रंथ, विज्ञान साहित्य व मासिके आदी साहित्यसंपदेची मांडणी करण्यात आली होती.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी प्रथमतः उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतातून त्यांनी काळाची गरज ओळखून पारिभाषिक संज्ञांचे महत्व अधोरेखित केले. भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्व ज्ञानशाखांनी आपले साहित्य मराठीमध्ये आणले पाहिजे. त्या म्हणाल्या की, ‘भाषेशिवाय व्यवहार झाला असता पण भावना व्यक्त होऊ शकल्या नसत्या.’ पुढे त्यांनी प्रत्येक राज्य भाषेसाठी करीत असलेले प्रयत्न आणि प्रदेशानुसार बदलत जाणारी बोलीभाषा यावर आपले मत प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामकाजातील मराठी, व्यवसायनिहाय होत जाणारा मराठीचा वापर आदींची उदाहरणे देताना भाषा कौशल्याचे महत्त्व पटवून दिले. पुढे त्या म्हणाल्या की, वयोमानानुसार आपले वाचन विषय बदलत जातात. तसेच मराठीचा वापर न होण्यामागील कारणमीमांसा करताना त्या म्हणाल्या की, लहान मुलांना मराठी लेखन अवघड वाटते. असे घडू नये म्हणून प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन जाणून घेतले.

यावेळी प्रा. शहाजी शिंदे, प्रा. वैभवी काळे, प्रा. सिद्धार्थ नवतुरे आदींनी मराठी भाषा आणि तिचे संवर्धन करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, मराठी बोलण्यासाठी आपण कमी पडत आहोत, तसेच शिक्षणाचे माध्यम मराठी हवे या विविध विषयावर मतप्रतिपादन केले. याप्रसंगी प्रियांका मारणे, अंजली तिवारी, मुक्ता काकडे, अनुजा टेकाळे, ऐश्वर्या जोगी, निलेश अहिरे, वृषाली मारणे, प्रीतमकुमार इंगळे, आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी कुसुमाग्रजांचा जीवनपट मांडून मराठीची पूर्वपीठिका विशद केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभागातील प्रा. अश्विनी जाधव, विद्यार्थी अनुजा रानवडे, प्रतीक्षा सोनार, अनुजा टेकाळे, वृषाली मारणे, मुक्ता काकडे आदींनी सुबक अशी रांगोळी काढली तर ग्रंथालय विभागातील प्रा. अविनाश हुंबरे, श्रीमती अरुणा पोटे, दीपक गालफाडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी यांनी केले. तर प्रा. अविनाश हुंबरे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय