दोन दिवसांत नियमावली जाहीर करणार – राजेश टोपे
मुंबई : महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही टोपे यांनी दिली.
रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 27, 2021
आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं मत लॉकडाउन लगेच काढणं शक्य होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.