पिंपरी चिंचवड, ता. १२ : पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभरणीत देशाचे पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर, माजी मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांचे खूप मोठे योगदान आहे. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शहराला विकास नगरी म्हणून नावारूपास आणले. नंतरच्या काळात प्रथमच भाजपच्या हाती जनतेने सत्ता दिली. परंतु भाजपचा अनिर्बध भ्रष्टाचार, नियोजन शून्य विकास कामामुळे शहराच्या प्रत्येक प्रभागमध्ये पाणीपुरवठा, जन आरोग्य, रस्ते विकास ई मूलभूत नागरी सुविधांपासून नागरिक उपेक्षित राहिलेले आहेत. याला जबाबदार येथील भाजपचे नेतृत्व आहे, अशी परखड टीका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी काळभोर नगर येथे पत्रकार परिषदेत केली.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी डॉ.कैलास कदम यांचा सत्कार केला. त्यावेळी शहरातील प्रधानमंत्री आवास योजना आणि घरांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत जवाहरलाल नेहरू शहरी गरीब योजनांसाठी (JNNURM) अंतर्गत २००८ मध्ये १३,२५२ घराची स्वस्त घरकुल योजना प्रथमच राबवण्यात आली, त्यावेळी मी मनपा मध्ये विरोधी पक्ष नेता होतो. ही संपूर्ण योजना यशस्वी करून अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरे मिळावीत यासाठी सभागृहात वारंवार मागणी केली होती. शहरातील हजारो मध्यमवर्गीय, अल्पउत्पन्न गटातील गरजूना स्वस्त घरकुले हवी आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना शहराला दिली. आवास योजना ही शहरातील नागरिकांचे स्वप्न आहे, ते सत्तारूढ भाजप नेतृत्वाने पूर्ण केलेले नाही. जनतेच्या निवारा हक्क, पाणी पुरवठा, जनआरोग्य इ सर्व अपेक्षा काँग्रेस पक्ष पूर्ण करेल, काँग्रेस पक्षच या शहरातील मध्यमवर्ग आणि श्रमिकांच्या आकांक्षा पूर्ण करेल. आम्ही या सर्व प्रलंबित नागरी प्रश्नावर आमची अभासपूर्ण योजना सादर करू असेही कैलास कदम म्हणाले.
भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले की, काँग्रेसचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पसरलेला आहे, ऐतिहासिक स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतात. फिनिक्स पक्षासारखी काँग्रेस पराभवातून भरारी घेते. आमची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. राष्ट्रीय नेतृत्वाने कामगार चळवळीत निरंतर काम केलेल्या अभ्यासू तरुण नेतृत्वाला शहराचे अध्यक्षपद दिले आहे. आम्ही शहरातील जेष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन २०२२ च्या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद घेणार आहोत. आम्ही शहराच्या विकासासाठी काम करत राहू असे साठे म्हणाले.
यावेळी शाम आगरवाल, कवीचंद भाट, निगार बारस्कर, श्यामला सोनवणे, मनोज कांबळे, राजेंद्रसिंग वालीया, अशोक मोरे, वासीम इनामदार, विश्वास गजरमल, सुंदर कांबळे, संग्राम तावडे, इस्माईल संगम, देवानंद गुप्ता, वकील गुप्ता, एन.तिरूमल, शकील खान इतर कार्यकर्ते उपस्थित होते.