निलंगा: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निलंगा तालुक्यामध्ये अतिवृष्टी वादळी वारे सह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, ऊस, मुग, उडीद, भुईमुग व ईतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक वाया गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना एकरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेकापने केली आहे.
यावेळी सुशील सोमवंशी, प्रा.दत्ता सोमवंशी, धोंडीराम सगरे, वैजिनाथ बिराजदार, लक्ष्मण सोळुंके, दिगंबर आनंदवाडे, व्यंकट जगताप, वसंत सुरवसे, बंडप्पा कोकणे, ज्ञानेश्वर शिंदे, रघुनाथ सुरवसे व अन्य शेतकरी उपस्थित होते.