Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : चार दिवसांच्या पावसात रस्ते खड्ड्यात जाण्यासाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर...

कोल्हापूर : चार दिवसांच्या पावसात रस्ते खड्ड्यात जाण्यासाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : चार दिवसांच्या पावसात रस्ते खड्ड्यात जाण्यासाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करा, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त (प्रशासक) यांच्याकडे एका ई – मेल निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केवळ चार दिवसांच्या पावसाने कोल्हापुरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये कोल्हापूर शहरातील जवळपास काही रस्त्यांचे पॅच वर्क व काही रस्ते नवीन करण्यात आले होते. 2019 पावसाळ्यामध्ये शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था परिस्थिती झाली होती. रस्ते शास्त्रीय पध्दतीने दुरूस्त केले नाहीत तर पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात जातील हे आम्ही त्यावेळी झालेल्या रस्त्यांचे कामासंदर्भात टेस्ट रिपोर्ट घ्यावा असे शहर अभियंताना व विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सूचित केले होते , मात्र तरीही थातूरमातूर पध्दतीने रस्ते दुरुस्ती व नवीन रस्त्यांची कामे करण्यात आली. आणि आज केवळ चार दिवसांच्या पावसात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. 

पुढे म्हटले आहे की, ज्या ज्या ठिकाणी रस्ते नवीन व पॅच वर्क केले थातूरमातूर पध्दतीने दुरुस्त केले गेले होते, बरोबर त्याच ठिकाणी रस्ते उखडून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परत एकदा नागरीकांनाच त्रास सहन करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती केली जाईल जी पुढच्या महिन्यात परत उखडून येईल. यात करदात्यांच्या करांचे पैसे खड्ड्यात जात आहेतच. शिवाय या खड्डेयुक्त रस्त्यावर प्रवास करताना नागरीकांनाच छळ सहन करावा लागणार आहे.

अधिकारी व कंत्राटदार आता या सगळ्यासाठी पावसाला जबाबदार धरून नामानिराळे होतील. जोपर्यंत अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं जाणार नाही व जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत यात सुधारणा होणे शक्य नाही. आयुक्तांनी स्वतः सर्व रस्त्यांची पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत माहिती घेऊन खराब झालेले रस्ते त्वरित करण्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया राबवावी व गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत व खड्डेमुक्त होण्यासंदर्भात प्रयत्न करावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती चे रमेश मोरे, अशोक पोवार, भाऊ घोडके, अजित सासणे, प्रमोद पुगावकर, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, पप्पू सुर्वे, राजेश वरक, विनोद डूणगं, लहुजी शिंदे यांनी केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय