Photo creadit : ANI |
नवी दिल्ली (दि. २८) : गेल्या काही दिवसांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. आज या चर्चेला पूर्ण विराम मिळाले आहे.
आज (मंगळवारी) सायंकाळी कन्हैया कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत, गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी देखील “वैचारिकदृष्ट्या” काँग्रेसमध्ये सामील होत आहे असे जाहीर केले, तसेच ते पुढे म्हणाले कि, काही तांत्रिक समस्यांमुळे ते आगामी काळात औपचारिकपणे पक्षा मध्ये सामील होईल.
कन्हैय्या कुमार यांचे भाषण ऐकण्यासाठी खाली क्लिक करा.
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी या दोन तरुण नेत्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत शहीद पार्कला भेट देऊन भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. मेवानी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात राहुल गांधींना संविधानाची प्रत सादर केली, तर कन्हैय्याने त्यांना महात्मा गांधी, भीमराव आंबेडकर आणि भगतसिंग यांचे चित्र सादर केले.
पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, कोट्यवधी तरुणांना असे वाटू लागले आहे की, जर काँग्रेस टिकली नाही तर देश टिकणार नाही आणि अशा परिस्थितीत ते लोकशाही बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की, देशात केवळ वैचारिक संघर्षाचे नेतृत्व काँग्रेसच करू शकते.
ते म्हणाले, “मला वाटते की या देशाच्या सत्तेमध्ये अशा मानसिकतेचे लोक व्यापलेले आहेत, जे या देशाची विचार परंपरा, संस्कृती, त्याची मूल्ये, इतिहास आणि वर्तमान नष्ट करत आहेत. आपल्याला या विचाराशी लढायचे आहे… देशातील सर्वात जुन्या आणि लोकशाही पक्षात सामील व्हायचे आहे कारण जर हा पक्ष टिकला नाही तर देश टिकणार नाही.”
तसेच, कन्हैया यांनी आपल्या जुन्या पक्षाचे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आभार मानले.
यावेळी काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास यांनी कन्हैया आणि जिग्नेश यांचे स्वागत केले.