जुन्नर : कल्याण – माळशेज घाट रस्त्याचा प्रवास सुकर होणार आहे, नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण-माळशेज घाट दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणाला भूसंपादन करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
तसेच कल्याण – अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाट गणेशखिंड ते आणे घाट (पुणे जिल्हा) येथील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भरीव निधी मंजूर करावा, अशी मागणी देखील डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे, ज्याप्रमाणे तळेगाव-चाकण – शिक्रापूर आणि पुणे-शिरूर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून दिला, अगदी तसाच या रस्त्याबाबतही विचार झाला पाहिजे, कारण या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी जानेवारी 2021 मध्ये देखील मागणी केली होती. तरी पुन्हा या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून काही ठिकाणी तर पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे आता या रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी न करता त्याच्या चौपदरीकरणासाठी याला भरीव निधी आपल्याला द्यावा लागणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून सादर करण्याची मागणी मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांना पत्राद्वारे केली आहे. तरी गडकरी साहेब आपणही याबाबत स्वतः लक्ष घालून निधी मंजूर करून द्यावा, अशी विनंती देखील डॉ. कोल्हे यांनी केली आहे.