जुन्नर : कांदा चाळीत अज्ञात इसमाने खोडसाळ वृत्तीने रासायनिक युरिया खत टाकल्यामुळे संपूर्ण चाळीतला कांदा खराब झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, बेल्हे येथील बांगरवाडी (ता.जुन्नर) गावातील दत्तात्रय बांगर यांच्या कांदा चाळीत अज्ञात इसमाने खोडसाळ वृत्तीने रासायनिक युरिया खत टाकल्यामुळे संपूर्ण चाळीतला कांदा खराब झाला आहे.
आधीच बाजारभाव कमी त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतक-याला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. कांदा भरण्यासाठी कामगार आले असताना हा प्रकार उघडकीस आला.
बांगर यांनी कांदा चाळीत जवळपास ३०० पिशवी कांदा साठवून ठेवला होता. त्यापैकी त्यांच्या चाळीच्या तीन कप्प्यातील म्हणजे १५० ते २०० पिशवी कांद्याचे नुकसान झाले असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी सप्टेंबर नंतल उन्हाळी कांद्याला वाढीव भाव मिळतील या आशेने बरेचसे शेतकरी जमेल तशा परिस्थितीत चाळीत अथवा शेडमध्ये कांदा साठवून ठेवतात. परंतु अशा खोडसाळपणामुळे शेतकरी नाउमेद होऊन नैराश्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकरी बांगर यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन गुन्हेगाराला योग्य शासन व्हावे अशी मागणी केली असून असाच प्रकार शेजारील एका शेतक-याच्या बाबतीतही घडला असून किटकनाशके फवारण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात तणनाशक टाकल्याने जवळपास दोन एकर कांदा जळून गेला होता, अशीही माहिती समोर येत आहे.
– संकलन : सौरभ मातेले